नवी दिल्ली : जगातील सर्वात उंच पर्वतशिखर असलेल्या एव्हरेस्टवर शेकडो वर्षांच्या काळात जमा झालेले बर्फ दरवर्षी वेगाने वितळत चालले आहे. क्लायमेट अँड अॅटमॉस्फिरिक सायन्स जर्नलमध्ये प्रकाशित एका नव्या संशोधनात हवामान बदलामुळे एव्हरेस्टवर झालेले हे परिणाम समोर आणले आहेत.
संशोधकांनी म्हटले आहे की माऊंट एव्हरेस्टवरील साऊथ कोल ग्लेशियरमधील बर्फ जमा होण्यास सुमारे दोन हजार वर्षांचा कालावधी लागला होता. येथील बर्फ अवघ्या 25 वर्षांमध्येच वितळून गेले आहे! पर्वतावरील ग्लेशियर तयार होण्याच्या तुलनेत ते वितळण्याचा वेग 80 पटीने अधिक आहे. या ग्लेशियरचे वितळणे तसे 1950 च्या दशकातच सुरू झाले होते. मात्र, त्याचे सर्वाधिक नुकसान 1990 च्या दशकानंतर झाले. गेल्या 25 वर्षांमध्ये साऊथ कोल ग्लेशियरचे 180 फूट बर्फ वितळून गेले आहे.
मानवाच्या चुकांमुळे पृथ्वीच्या वातावरणात प्रदूषणकारी वायूंचे प्रमाण वाढत आहे. एखाद्या ग्रीनहाऊससारखेच आवरण बनून सूर्याची उष्णता पृथ्वीच्या वातावरणात कोंडून ठेवणार्या या वायूूंमुळे जगाचे तापमान वाढत आहे. त्याचा परिणाम ध—ुवीय प्रदेशांपासून हिमालयापर्यंत सर्वत्र दिसून येत आहे. 2019 मध्ये मेन युनिव्हर्सिटीच्या सहा संशोधकांसह गिर्यारोहकांनी एव्हरेस्टच्या ग्लेशियरवर संशोधन सुरू केले. टीमने बर्फाच्या दहा मीटर लांबीच्या तुकड्यापासून नमुने गोळा केले. हवामान बदलाचा परिणाम जगातील सर्वात उंच पर्वतशिखरावरही झाला आहे का हे पाहण्यासाठी अशा प्रकारचे संशोधन सुरू करण्यात आले होते.
आता प्रमुख संशोधक पॉल मेवेस्की यांनी म्हटले आहे की याचे उत्तर होकारार्थी मिळालेले आहे! एव्हरेस्टवरील ग्लेशियरचे बर्फ वितळणे ही जगासाठी अतिशय वाईट खबर आहे. त्यामुळे हिमस्खलन आणि दुष्काळासारख्या अनेक आपत्तींचा सामना करावा लागू शकतो. या पर्वतराजीवर सुमारे 1.6 अब्ज लोक पिण्याच्या पाण्यासाठी अवलंबून आहेत. या पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच जलविद्युत प्रकल्पासाठीही होत असतो.
हेही वाचा