पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे यांची दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यादरम्यान नागपूर येथे सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. त्याचबरोबर "फडणवीस यांची अवस्था दयनीय आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. फडणवीस हे नागपूरला कलंक आहेत, अशीही टीका ठाकरेंनी केली होती. या टीकेला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कलंकीचा काविळ'! असं लिहित जोरदार पलटवार केला आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण. (Thackeray vs Fadnavis)
उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'कलंकीचा काविळ' ! असं ट्विट केलं आहे, ट्विटमध्ये त्यांनी काही मुद्दे मांडले आहेत. ते पुढीलप्रमाणे
1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक! 2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक! 3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक! 4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक! 5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक! 6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक! 7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक! 8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक! असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला 'कलंकीचा काविळ' झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी!