पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेना-ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज त्यांच्या दौऱ्यातील दुसरा दिवस आहे. यावेळी त्यांची नागपूर येथे सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, मला भाजपची चिंता नाही, तर माझ्या देशाची चिंता आहे. या देशात राहणाऱ्या माझ्या लोकांची चिंता आहे. तसेच त्यांनी यावेळी भाजपवर अगदी खोचक टीका देखील केली. भाजपचं नाव भ्रष्ट जनता पार्टी करा अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
नागपूरमधील या सभेदरम्यान काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. यावेळी उद्धव ठाकरे संतापले होते. दरम्यान थोड्या गोंधळातील वातावरणानंतर सभा पुन्हा सुरळीत झाली. त्यानंतर ठाकरेंची तोफ कडाडली. या सभेत त्यांनी सामान्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्या, मणीपूरवर विशेष लक्ष राहू द्या, आमच्या हिंदूत्वार बोलू नका अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी मत व्यक्त केले.
बाळासाहेब फोटोंमध्ये नाहीत. ते माणसांमध्ये वसले आहेत. फक्त फोटो लावून चालणार नाही, अशी टीका शिंदे गटावर केली. महाराष्ट्रात मोदी नाणे चालणार नाही. जसं कर्नाटकात चाललं नाही असेही ते यावेळी म्हणाले.
एका शब्दावर खूप मोठी चर्चा झाली होती. चाय पे चर्चा हा त्यांचा कार्यक्रम. मी तर म्हणतो आता होऊन जाऊदे चर्चा असा कार्यक्रम घेऊयाच. 'मन की बात' करतात मन आहे की नाही? भाजप सरकारने दिलेल्या कोणत्या योजना सध्या चालू आहेत, असा सवाल देखील त्यांनी केला. भाजपचं नाव भ्रष्ट जनता पार्टी करा अशी कडवी टीका ठाकरेंनी केली. भाजपने भगव्याशी फाटाफूट केली आहे. दंगली करुन राजकारणाची पोळी भाजली जात आहे.
फडणवीस यांची अवस्था दयनीय आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. फडणवीस हे नागपूरला कलंक आहेत अशी टीका ठाकरेंनी केली.
गिरीष महाजन म्हणाले होते की, महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री मिळणार नाहीत असं म्हणायचे. फडणवीसांनी देखील नाही नाही नाही म्हणत काय केलं माहिती आहे. त्यामुळे ते जे बोलतात त्याच्या नेहमी उलटं करत असतात हे लक्षात ठेवा.
ह्रदयात राम आणि हाताला काम हे आमचं हिंदूत्व आहे. विचारांशी गद्दारी करणारी आमच्या हिंदूत्वाबाबत बोलायचं नाही. शाखा तोडताना बाळासाहेबांच्या फोटोंवर हातोडा मारलेला होता. भाजप नेत्यांच्या फोटोवर हातोडा मारुन दाखवा. दिल्लीतून तुमच्या डोक्यावर हातोडा पडेल असं ठाकरे यावेळी म्हणाले.
इंदिरा गांधींनी आणीबाणी आणल्याने विरोध केला होता. त्यांना हुकुमशाहा म्हटलेलं होतं. पण त्यांनी आणीबाणीनंतर निवडणुका लावलेल्या होत्या. पण तुम्ही काय करत आहात? तुम्ही आणीबाणीसारखी परिस्थिती आणत आहात, अशी टीका भाजपवर केली. नेत्यांचा भाव वाढत आहे, पण माझ्या शेतकऱ्याला भाव मिळत नाही. त्यामुळे ही लढाई माझ्या एकट्याची नाही. ही लढाई जनतेच्या कल्याणासाठी आहे.
मला भाजपची चिंता नाही, मला चिंता आहे ती माझ्या देशाची. या देशात राहणाऱ्या लोकांची. लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडाला तर अवघड होईल. ईडी सारख्या यंत्रणांना सोबत घेऊन काम करु नका. मर्दाची औलाद असाल तर सरकारी यंत्रणांना बाजूला ठेवून काम करा. लोकांच्या हितासाठी काम करा.
मणिपूर अजून धुमसतंय. मोदी तिकडे जात नाहीत. तिकडे ईडी, सीबीआयला पाठवा. त्या जनतेचे प्रश्न पाहा असं ठाकरे यावेळी म्हणाले.
हे ही वाचा :