पुढारी ऑनलाईन डेस्क: जनता दल (युनाडेट) चे सर्वेसर्वा नितीश कुमार यांनी आज (दि.२८) सकाळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. यामुळे बिहारमधील महाआघाडीचे सरकार संपुष्टात आले. यानंतर नितीश कुमार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला असून, ते आजच पुन्हा नव्याने बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथबद्ध होत आहेत. बिहारमधील या राजकीय नाट्यावर 'राजद' चे नेते बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रीया दिली आहे. (Tejashwi Yadav On Nitish Kumar)
बिहारच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा मोठी उलथापालथ झाली आहे. नितीश कुमार यांनी पुन्हा यू-टर्न घेत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्यातील १७ महिन्यांचे महाआघाडीचे सरकार कोसळले. यानंतर भाजपसोबत संसार थाटण्याच्या घडामोडींना वेग आला आहे. या राजकीय स्थितीवर माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी "2024 मध्ये जेडीयू पक्ष संपुष्टात येईल, हे मी तुम्हाला लेखी देऊ शकतो. कारण जनता आमच्यासोबत आहे." असे भाकीत तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्या पक्षाबाबत वर्तवले आहे. (Tejashwi Yadav On Nitish Kumar)
पुढे तेजस्वी यादव यांनी "आम्ही केलेल्या कामाचे श्रेय का घेऊ नये?… जे मुख्यमंत्री म्हणायचे की नोकऱ्या देणे अशक्य आहे, आम्ही नोकऱ्या दिल्या आणि ते शक्य आहे हे दाखवून दिले. असे माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आम्ही पर्यटन, आयटी आणि क्रीडा क्षेत्रात नवीन धोरणे आणली आहेत. जे काम १७ महिन्यांत झाले ते १७ वर्षांत (भाजप-जेडीयूच्या राजवटीत) होऊ शकले नाही. १७ महिन्यांत आम्ही ऐतिहासिक काम केले, असेही मत यादव यांनी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीतव्यक्त केले. (Tejashwi Yadav On Nitish Kumar)
आम्ही सांगतो तेच करतो. खेळ आता सुरू झाला आहे. जे काही होते ते चांगल्यासाठीच होते. तसेच देशातील विरोधी पक्षांची 'इंडिया' आघाडी मजबूत आहे. असे देखील तेजस्वी यादव यांनी यावेळी म्हटले आहे.