पुढारी ऑनलाईन डेस्क : दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाची आज (दि. १५) महत्त्वाची पत्रकार परिषद झाली. सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर खिळल्या होत्या. वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हटवल्यानंतर, तसेच रोहित शर्मासोबतच्या वादाच्या वृत्तांमुळे विराट गेले काही दिवस सातत्याने मीडियाच्या चर्चेत आहे. अशा स्थितीत त्याला असे अनेक प्रश्न विचारण्यात आले, ज्यांची उत्तरे त्याने दिली. (Virat Kohli vs Sourav Ganguly)
विराट कोहलीने पत्रकार परिषदेत आपण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे मालिका खेळणार असल्याचे स्पष्ट केले. त्याच वेळी, त्यांने सुट्टी किंवा विश्रांती घेण्याबाबतचे वृत्त फेटाळले. कोहली म्हणाला, 'मी एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध आहे. लोक चुकीचे माहिती पसरवत आहेत. त्यांचे माहितीचे स्त्रोत ठोस नसल्याचा ही त्याने टोला लगावला.
टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्यापूर्वी मी बीसीसीआयला याबाबत माहिती दिली होती. त्यावेळी मी माझा दृष्टिकोन त्यांना स्पष्ट केला होता. बीसीसीआयने माझा निर्णय सहजपणे स्वीकारला. माझे भांडण किंवा वाद काहीच नव्हते. तेव्हा मी स्पष्ट केले की, मी फक्त टी-20 कर्णधारपद सोडत आहे, मी कसोटी आणि एकदिवसीय कर्णधारपद कायम ठेवणार आहे. मी असंही स्पष्ट सांगितले की, निवड समितीला जर मी कोणतीही जबाबदारी सांभाळण्यास अपात्र असे वाटल्यास ते योग्य निर्णय घ्यायला मोकळे आहेत. (Virat Kohli vs Sourav Ganguly)
कोहली पुढे म्हणाली की, 'निवड समितीने कसोटी संघ निवडण्याच्या दीड तास आधी माझ्याशी संपर्क साधला. कसोटी संघ निवडीवरून चर्चा झाली. फोन कॉल संपण्याच्या काही मिनिटे आधी निवड समितीने मला एक महत्त्वपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले की, तुला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हटवण्यात आले असून यापुढे तु संघाचे नेतृत्व करणार नाहीस. त्याच क्षणी मी निवडकर्त्यांचा निर्णय मान्य करून त्यांना ठिका असं सांगितले.' (Virat Kohli vs Sourav Ganguly)
वनडे संघाच्या कर्णधारपदावरून हटवल्याच्या निर्णयाकडे तु कसं पाहतोस? असा सवाल केल्यानंतर या प्रश्नाचे उत्तर देताना कोहलीने नेमके उत्तर दिले. तो म्हणाला की, 'मी कारणे समजू शकतो. बीसीसीआयने तार्किक दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे. माझ्यात आणि रोहित शर्मामध्ये कोणताही वाद नाही. मी गेल्या दोन वर्षांपासून स्पष्टीकरण देत आहे आणि थकलो आहे. माझी कोणतीही कृती किंवा निर्णय संघाला खाली आणण्यासाठी असणार नाही, असे त्याने स्पष्ट केले.
यापूर्वी विराट मुंबईतील संघाच्या सराव शिबिरात सहभागी झाला नव्हता. त्यानंतर रोहित शर्माने दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील कसोटी मालिकेतून माघार घेतली. या वृत्तानंतर दुसऱ्या दिवशी विराट संघात सामील होतो, पण त्यानंतर बातमी येते की विराट दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर वनडे मालिका खेळणार नाही. मुलगी वामिकाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त त्याला सुट्टी घेऊन कुटुंबासोबत काही वेळ घालवायचा आहे. त्यामुळे टीम इंडियामध्ये सर्व काही ठीक नसल्याचे वृत्त वेगाने व्हायरल झाले. अखेर आज विराट कोहलीने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना उत्तरे दिली.
खरे तर, यापूर्वी सौरव गांगुली यांनी एका मुलाखतीत विराट कोहलीच्या टी 20 कर्णधारपदाच्या राजीनाम्याविषयी महत्त्वाचे विधान केले होते. ते म्हणाले की, आम्ही विनंती केली होती की त्याने टी 20 कर्णधारपद सोडू नये. मी स्वत: विराटशी बोललो होतो आणि त्याला टी 20 कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला दिला होता. पण विराटला या पदावर राहायचे नव्हते आणि त्याने टी 20 विशवचषक स्पर्धेनंतर तो राजीनामा देण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे कळवले. अखेर रोहित शर्माला टी20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले. पण त्यानंतर निवडकर्त्यांना वनडे आणि टी 20 संघासाठी दोन वेगवेगळे कर्णधार असण्याऐवजी एकच असावा असे वाटले. त्या मुद्यावर चर्चाही झाली.