पुढारी ऑनलाईन डेस्क : तमिळनाडू राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल असे वातावरण चांगलेच तापले आहे. अभिभाषणादरम्यान मुख्यमंत्री स्टॅलिन (Tamilnadu CM) आणि राज्यपाल यांच्यातील वादामुळे हे प्रकरण चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री म्हणून स्टॅलिन यांनी जपलेला स्वाभिमान हा कळीचा मुद्दा ठरला. स्टॅलिन यांच्या रोषामुळे राज्यपालांनी सभागृहातून थेट काढता पाय घेतला. याच विषयाचा संदर्भ देत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. असा स्वाभिमान महाराष्ट्र सरकार कधी दाखविणार असा सवाल त्यांनी उपस्थिता केला आहे.
तमिळनाडूच्या चर्चेतील मुद्याचा दाखला देत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, 'स्वाभिमान से भरा हुआ ये स्वॅग कुछ अलग है! राज्यपालांनी भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांचं नाव न घेतल्याने तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी स्वाभिमानी बाणा दाखवला आणि राज्यपालांना विधानसभेतून काढता पाय घ्यावा लागला. असाच स्वाभिमानी बाणा महाराष्ट्र सरकार दाखवणार का?' अशा आशयाचे हे ट्विट आहे. (Tamilnadu CM)
महाराष्ट्राचे राज्यपालांच्या विधानांचे सत्र गेले अनेक दिवस चालू होते. विरोधकांनी त्या विरोधात रान उठवले होते. अनेक गंभीर आरोप केले. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलेले होते. राज्यपालांविरोधात महाराष्ट्र सरकारने ठोस पाऊल उचलावे यासाठी विरोधक आक्रमक झाले होते. तमिळनाडूतील घटनेनंतर रोहित पवार यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचे समर्थन करणारे एक ट्विट केले. त्यांनी केलेल्या ट्विटमधून महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यपालांचे वॉकआऊट प्रकरण सध्या जोरदार चर्चेत आहे. याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.
राज्यपाल रवि यांनी आपल्या भाषणातून धर्मनिरपेक्षता, तमिळनाडू हे शांतीचे स्वर्ग आहे, डॉ. बाबसाहेब आंबेडकर, के कामराज, सीएन अन्नदुराई आणि करुणानिधी यांसारख्या नेत्यांचा उल्लेख केला नाही. यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी भर विधानसभेत राज्यपाल आर. एन. रवी यांच्या अभिभाषणावरून जोरदार टीका केली. हा वाद वाढला. भडकलेल्या राज्यपालांनी सभागृहावर बहिष्कार टाकला आणि सभात्याग केला. या प्रकारामुळे तमिळनाडूचे राजकारण चांगलेच तापले.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यपालांच्या भाषणातील काही मुद्यांना अधोरेखित करत वगळण्यात आलेल्या विषयांवर भर दिला. त्याचबरोबर राज्यपाल यांच्याविरोधात रोष व्यक्त केला. या रोषानंतर राज्यपाल संतापले आणि सभागृह सोडून गेले. राज्यपालांच्या पाठीमागे असलेल्या द्रमुकच्या आमदारांनी ते आसन सोडत असताना घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी केलेल्या वॉकआऊटचे व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.