Latest

तलाठी नव्हे आता ‘ग्राम महसूल अधिकारी’; मंत्री विखे- पाटील यांची घोषणा

दिनेश चोरगे

छत्रपती संभाजीनगर; पुढारी वृत्तसेवा : गावपातळीवर महसूल विभागाचा चेहरा असलेल्या तलाठी पदनामात बदल करून 'ग्राम महसूल अधिकारी' असे नाव देण्याची घोषणा महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्यासही राज्य सरकारने मान्यता दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर येथे तलाठी संघटनेच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्यासह महसूल विभागाचे सर्व वरीष्ठ अधिकारी तसेच राज्यातून आलेले तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री विखे- पाटील म्हणाले की, तलाठी या पदनामात बदल करून 'ग्राम महसूल अधिकारी' या नावास तत्वता मान्यता देण्यात येत असल्याचे सांगून तलाठी संघटनेच्या नावात बदल करण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित होती. राज्यातील युती सरकारने याबाबत निर्णय करून आता संघटनेचे नाव महाराष्ट्र राज्य तलाठी संघ असे करण्यास मान्यता दिली असून त्याचा शासन आदेशच विखे पाटील यांनी अधिवेशनात दाखवला. मंत्री विखे पाटील यांनी केलेल्या घोषणांचे टाळ्यांच्या गजरात उपस्थितांनी स्वागत केले. यापुर्वी एक सझा एक कोतवाल असे धोरण घेण्यात आले असून ३ हजार ११० सजे निर्माण करण्यास शासनाने मान्यता देण्यात आल्याचे सांगतानाच महसूल सहायक व तलाठी संवर्गतील १० वर्ष सलग सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांना मर्यादित विभागीय स्तरावर स्पर्धा परीक्षांना संधी देण्यासाठी तुमच्या हिताचा निर्णय शासन निश्चित करेल, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

महसूल विभागाचा चेहरा असलेले तलाठी सरकार प्रमाणेच सामाजिक बांधिलकीने काम करीत आहेत. कोणतेही सकंट असो, आव्हानात्मक परिस्थितीत सरकारचे प्रतिनिधी म्हणून आपण बजावत असलेल्या भूमिकेला सलाम करण्यासाठी या अधिवेशनात उपस्थित असल्याचे विखे पाटील यांनी आवर्जून सांगितले. तलाठी भरती प्रक्रिया अतिशय पारदर्शी पध्दतीने राबविण्यात आली.परंतू केवळ शासनाला बदनाम करण्यासाठी आरोप केले जात आहे. विरोधकांच्या आरोपामुळे तुम्ही सुध्दा बदनाम होत असल्याची जाणीव करून आपल्या संघटनेने पुढे येवून या आरोपांचा निषेध करण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT