नाशिक : पुढारी वृत्तसेवा
हांगझोऊ येथे होणाऱ्या १९ व्या आशियाई तायक्वांदो स्पर्धेसाठी भारताच्या संघाची निवड करण्यासाठी नाशिकच्या विभागीय क्रीडा संकुलात आयोजित अखिल भारतीय तायक्वांदो स्पर्धा आणि निवड चाचणीसाठी देशभरातील २२० खेळाडूंनी विक्रमी सहभाग नाेंदविला. या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची प्राथमिक निवड करण्यात येणार आहे.
तायक्वांदो निवड चाचणीचे उद्घाटन आचार्य महामंडलेश्वर महंत सुधीरदास महाराज यांच्या हस्ते पार पडले. यावेळी तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नामदेव शिरगांवकर, स्पर्धा समन्वयक ग्रँड मास्टर कियाराश बहरी, अशिया तायक्वांदो फेडरेशनचे प्रतिनिधी मास्टर वान युंग लि., आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू हसेन बहेष्टी आदी मान्यवर उपस्थित होते. निवड चाचणीनंतर सराव शिबिरांमधून खेळाडूंची भारताच्या संघात अंतिम निवड करण्यात येणार आहे. देशातील प्रत्येक खेळाडूला पूर्ण संधी देण्याचा मानस असल्याचे शिरगावकर यांनी सांगितले.
दरम्यान, स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या ४९ किलो गटात दीक्षा शर्माने, तर ५७ किलो गटात शिवांगी चनमबम यांनी प्रथम क्रमांक मिळविला. पुरुषांच्या ५८ किलो गटात अमान कुमारने, तर ८० किलो गटात विकास शिवा यांनी बाजी मारली.
हेही वाचा :