पुढारी ऑनलाईन डेस्क : Sikandar vs Virat : झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्धच्या सामन्यात शानदार कामगिरी करताना एका धावेने सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात सिकंदर रझाने योग्य वेळी तीन विकेट घेतल्या आणि पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले. रझाला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कारही (MOM) देण्यात आला. विशेष म्हणजे, त्याने वर्ल्ड कप आणि एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक सामनावीराचा पुरस्कार जिंकण्याच्या स्पर्धेत विराट कोहलीला मागे टाकले आहे.
टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेने पाकिस्तानचा अवघ्या एका धावेने पराभव केला. या सामन्यात झिम्बाब्वेने पहिला फलंदाजी करत 130 धावा केल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पाक संघासाठी 131 धावांच्या विजयी लक्ष्याचा पाठलाग करणे अवघड नव्हते, परंतु झिम्बाब्वेच्या क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांनी या सामन्यात उलटफेर केला आणि त्यांना 129 धावांमध्ये रोखले. याचबरोबर झिम्बाब्वेने हा सामना 1 धावेने जिंकला. त्यांच्या या लढवय्या खेळीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. (Sikandar vs Virat)
दरम्यान, या सामन्यात झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझाने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले. त्याने पाकिस्तान संघाला एकाच षटकात दोन धक्के देत त्यांचे कंबरडे मोडले. शादाब खान आणि शान मसूद यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि पाकिस्तानचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण 88 धावसंख्येवर शादाब खान बाद (14 चेंडूत 17 धावा) झाला. त्याला रझाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर त्याच षटकात हैदर अलीला माघारी धाडण्यात रझाला यश आले. हैदर शुन्यावर बाद झाला. त्यानंतर रझाने पुन्हा एकदा 15.1 व्या षटकात पाकिस्तानला मोठा धक्का दिला. त्याने मसूदला पॅव्हेलियचा रस्ता दाखवला. मसूद एका बाजूने पाकचा डाव लढवत होता. मात्र तो 44 धावांवर असताना रझाने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. यावेळी पाकची धावसंख्या 6 बाद 94 होती.
टी 20 विश्वचषकात सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकावण्यात सिकंदर रझा आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी 20 विश्वचषकात त्याने तीनदा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार पटकावला आहे, तर विराट कोहलीला 2016 च्या टी 20 विश्वचषक स्पर्धेत दोनदा सामनावीर म्हणून गौरवण्यात आले आहे. एका कॅलेंडर वर्षाबद्दल बोलायचे झाल्यास, झिम्बाब्वेच्या सिकंदर रझाने या वर्षी 7 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे, तर विराट कोहलीने 2016 मध्ये हा पुरस्कार 6 वेळा जिंकला होता. पाकिस्तानात जन्मलेल्या सिकंदर रझाला पाकिस्तानच्या हवाई दलात पायलट व्हायचे होते, पण नेत्र चाचणीत अपयशी ठरल्याने त्याचे स्वप्न अधुरेच राहिले. मात्र झिम्बाब्वे संघाचे प्रतिनिधित्व करत सिकंदर जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव आता सुवर्ण अक्षरात कोरले आहे.
6 वेळा – सिकंदर रझा
5 वेळा – सूर्यकुमार यादव
4 वेळा – कुसल मेंडिस
4 वेळा – मोहम्मद रिझवान
4 वेळा – ग्लेन फिलिप्स
7 – सिकंदर रझा (2022)
6 – विराट कोहली (2016)
5 – सूर्यकुमार (2022)
5 – मोहम्मद रिझवान (2021)
5 – शेन वॉटसन (2012)