अहमदनगर पुढारी ऑनलाईन : पुरोगामी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक हेरंब कुलकर्णी यांच्यावर सात ऑक्टोबर रोजी सावेडीत अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. हल्ला करणार्या पाच आरोपींपैकी तीन जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा देखील समावेश असल्याचे पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
हेरंब कुलकर्णी यांनी महापालिकेला अर्ज दिल्याने सीताराम सारडा शाळेजवळील पानटपरी काढण्यात आली होती. त्याचा राग धरून अक्षय विष्णू सब्बन (रा. दातरंगे मळा) याच्या सांगण्यावरून चैतन्य सुनील सुडके (रा. सुडकेमळा), अक्षय (पूर्ण नाव माहीत नाही), सनी जगधने व एक विधीसंघर्षित बालक यांनी ही मारहाण केल्याचे समोर आले आहे. त्यातील अक्षय सब्बन, चैतन्य व एक बालक अशा तिघांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मारहाण झालेल्या परिसरातील दुकानांच्या सीसीटीव्हींच्या चित्रीकरणातून आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी म्हटले आहे.
हेरंब कुलकर्णी हे सारडा विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांनी शाळेलगत विक्री होणार्या सिगारेट, तंबाखू विरोधात मोहीम हाती घेतली होती. त्या टपर्यांवर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडले होते. याच रागातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान कुलकर्णी हे शनिवारी दुपारी शाळेतून सावेडीतील घरी परतत होते. आजारी असल्याने सुनील कुलकर्णी या शिक्षक मित्राच्या मोटारसायकलवरून ते जात होते. रासनेनगर चौकात तीन तरुणांनी त्यांची मोटारसायकल अडविली. लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यात व पायांवर मारहाण केली. रॉडचा डोक्यात बसणारा दुसरा घाव सुनील कुलकर्णी यांनी अडविल्याने ते बचावले. नंतर हल्लेखोर पसार झाले. जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर कुलकर्णी यांनी तोफखाना पोलिसांत धाव घेतली आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा