पुढारी ऑनलाईन डेस्क : 'काहे दिया परदेस' फेम अभिनेत्री सायली संजीवच्या (sayali sanjeev) 'गोष्ट एका पैठणीची' चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराचा बहुमान मिळाला आहे. ६८ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आलीय. 'गोष्ट एका पैठणीची' हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला. सायली मुळची नाशिकची आहे. तिने छोट्या पडद्यावरून चित्रपटापर्यंत मजल मारली. ती काहे दिया परदेस या मालिकेत काम केले होते. याच मालिकेतून तिची शिवची गौरी म्हणून ओळख झाली. ती एका बनारसी मुलाच्या प्रेमात पडलेली दाखवण्यात आले होते. गौरी साळुंखे आणि तिच्यास कुटुंबाभोवती फिरणारी कथा या मालिकेचा मूळ गाभा होता. या मालिकेत ती सोज्वळ, साधी दाखवण्यात आली होती. गोष्ट एका पैठणीची या चित्रपटाच्या पडद्यामागील गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? चला तर मग जाणून घेऊया या इंटरेस्टिग गोष्टी. (sayali sanjeev)
त्याआधी गोष्ट एका पैठणीची या चित्रपटात कोण कोण कलाकार होते पाहुया.या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनू रोडे यांनी केलं आहे. प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्सनं, लेकसाईड प्रोडक्शन ने 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.
'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचं चित्रीकरण लॉकडाऊनपूर्वीच पूर्ण झालं होतं. पण, जे काही थोडं शूटिंग राहिलं होतं ते सुव्रत जोशीवर चित्रीत करण्यात येणार होतं. अभिनेता सुव्रत जोशीने याविषयी आपले अनुभव सांगितले होते. लॉकडाऊनपूर्वी चित्रीत केलेल्या 'गोष्ट एका पैठणी'ची या चित्रपटाचं त्याचं राहिलेलं डबिंग त्यानं चक्क लंडनमध्ये पूर्ण केलं होतं.
'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटाचं चित्रीकरण लॉकडाऊनपूर्वीच पूर्ण झालं होतं. सरकारने अनलॉकिंग सुरू केल्यावर चित्रपटाच्या डबिंगची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानुसार बाकी सर्व कलाकारांचं डबिंग पूर्ण झालं. मात्र सुव्रत लंडनमध्ये अडकला. त्यामुळे मुंबईत येऊन त्याला डबिंग करणं शक्य नव्हतं. लंडनमध्ये एक स्टुडिओशोधला आणि डबिंग पूर्ण केलं. स्टुडिओतल्या तंत्रज्ञांपैकी एक जण बांगलादेशातील आणि एक जण पोलंडमधील होते. त्यांना मराठी येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भाषेचा अडथळा येत होता. पण त्यातूनही डबिंग उत्तम पद्धतीने झाले हा अनुभव खरोखरच क्रेझी होता, असे सुव्रतने सांगितले होते.
सायलीचा जन्म ३१ जानेवारी १९९३ रोजी धुळे येथे झाला. सायलीचे नाव सायली संजीव चांदसारकर असे आहे. तिने आरजेसी बिटको शाळेत शिक्षण घेतले. तर नाशिकच्या महाविद्यालयातून राज्यशास्त्रात पदवीचे शिक्षण घेतले.
सायलीने पोलिस लाईन, आटपाटी नाईट्स, सातारचा सलमान या चित्रपटांमध्ये काम केले आहे. मन फकिरा या सुंदर चित्रपटातही ती दिसली होती. 'मन फकिरा' हा चित्रपट असून नातेसंबंधांवर भाष्य करणारा होता. या चित्रपटात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील, अंकित मोहन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अलिकडे ती झिम्मामध्येही झळकली होती. सायली टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा आहे. तिच्या अदा, तिचं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर तिने हे यश मिळवलं आहे.