सांगली, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली आहे. त्यामुळे सांगली, मिरज विधानसभा, लोकसभा, सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेसह सर्व निवडणुका घडाळ्याच्या चिन्हावर स्वबळावर लढवा, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी येथे संवाद यात्रेनिमित्त आयोजित मेळाव्यात केली.
मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष व पालकमंत्री जयंत पाटील, आ. अरुण लाड, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, शहर – जिल्हाध्यक्ष संजय बजाज, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश पाटील, मैहबूब शेख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख , शेखर माने, राहुल पवार आदी उपस्थित होते.
ना. पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात तिन्ही शहरात पक्षाची स्थिती चांगली आहे. राष्ट्रवादीचा महापौर झाल्यापासून विकासाची गाडी सुसाट आहे. हॉस्पिटल, काळीखण सुशोभीकरण, असे अनेक उपक्रम सुरू आहेत. पक्ष अधिक बळकट होत आहे. मतदारांच्या संपर्कात रहा. त्यांच्या अडचणी सोडवा.
रुपालीताई चाकणकर म्हणाल्या, देशात, राज्यात जातीयवाद वाढत आहे. त्याचा मुकाबला करण्यासाठी सामान्यापर्यंत पोहोचून त्यांची कामे करा. पक्षसंघटन अधिक मजबूत करा. महापौर सूर्यवंशी म्हणाले, सांगलीची जागा राष्ट्रवादीला मिळायला हवी. राहुल पवार म्हणाले, निवडणुका स्वबळावर लढवण्यास अडचण येणार नाही. प्रा. पद्माकर जगदाळे म्हणाले, सांगली विधानसभेसाठी आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही.
राष्ट्रवादीचे सांगली शहर अध्यक्ष संजय बजाज म्हणाले, विधानसभेला सांगलीतून गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. सांगली काँग्रेसमध्ये तीन गट आहेत. आता राष्ट्रवादीची ताकद वाढल्यामुळे या ठिकाणची जागा राष्ट्रवादीला देण्यात यावी. या ठिकाणी प्रतीक जयंत पाटील यांना उमेदवारी दिल्यास ते मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. त्यावर कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत दाद दिली.