कवठेमहांकाळ : पुढारी वृत्तसेवा दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेल्यानंतर पाय घसरून बंडगरवाडी तलावात पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय ४८) आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण (वय १८) रा. दोघेही करोली टी ता. कवठेमहांकाळ जि. सांगली या बापलेकांचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही दुर्घटना मंगळवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास घडली. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांनी व स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, करोली टी येथील राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण आणि कार्तिक राजेंद्र चव्हाण हे घरातील धुणी धुण्यासाठी बंडगरवाडी तलाव परीसरात गेलेले होते. यावेळी ते पाय घसरुन पडले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तलावाच्या लगत स्थानिकांना त्यांचे धुण्याचे कपडे दिसले, मात्र कोणी न दिसल्याने त्यांना संशय आला. यावरुन पाहणी केली असता, तलावात त्या दोघांचेही मृतदेह सापडले. या दुर्घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचे मृतदेह हे शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. रात्री उशीरा पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. दरम्यान बाप-लेकांचा मृत्यू नेमका कसा झाला आहे, याबाबत आता कांही सांगता येत नाही. अशी माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांनी दिली आहे.
हेही वाचा :