Latest

Rohit Pawar : …त्यावेळी कॅबिनेटमध्ये भुजबळ शांत का होते? : रोहित पवारांचा सवाल

मोहन कारंडे

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : शिंदे समितीबद्दल रस्त्यावर सभा घेऊन आक्रमकपणे बोलले जात आहे. मात्र कॅबिनेटमध्ये हा निर्णय होताना कॅबिनेटमंत्री छगन भुजबळ शांत का होते? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी सोमवारी उपस्थित केला. सेनगाव तालुक्यात संघर्ष यात्रेचे आगमन झाले. यावेळी माध्यमांशी बोलत होते.

यावेळी रोहित पवार म्हणाले की, मंत्री भुजबळ मोठे नेते आहेत. त्यांच्या भाषणात पूर्वी समता, एकता, बंधुता असे बोलले जात होते. मात्र ते भाजपा सोबत गेल्यानंतर त्यांचे विचार बदलले, असा आरोप त्यांनी केला.

भाजपाचे नेते सतत खोटे बोलतात. मराठवाड्याला २०१५ मध्ये विकास कामांसाठी ४२ हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्यातील एक रुपयाही खर्च झालेला नाही. पहिल्याच कॅबीनेटमध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा सोडविण्याचे आश्‍वासन पूर्ण केले नाही. भाजप जवळ गेल्यामुळे भुजबळांनाही खोटे बोलण्याची सवय झाली असावी, असे टोला त्यांनी लगावला.

राज्यात ओबीसी-मराठा यांच्यात वाद पेटवून लोकसभेच्या निवडणुका घेवून जागा जिंकण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. शिंदे समिती बरखास्त करा, या भुजबळांच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, शिंदे समितीचा निर्णय कॅबीनेटमध्ये झाला आहे. त्या ठिकाणी मंत्र्यांना बोलण्याची संधी असते. मात्र भुजबळ त्या ठिकाणी का बोलले नाहीत. कॅबीनेट मंत्री हे संविधानीक पद असतानाही ते रस्त्यावर उतरून आक्रमक बोलतात, मग आम्ही काय समजायचे? आसा सवाल करत भुजबळांनी कॅबीनेटमध्ये जाऊन चर्चा केली पाहिजे, असे ते म्हणाले.

केंद्रीयमंत्री नारायण राणे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीबद्दल बोलताना पवार म्हणाले की, दोघांनाही आता निवडणुका सोप्या नाहीत. त्यांना निवडणुकीत परायजाची भिती वाटत असावी. त्यामुळे ते भेटले असावे. मात्र त्यांच्यामध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाली हे पाहणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT