पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला टीमची यष्टीरक्षक रिचा घोष (Richa Ghosh) हिने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. रिचाने न्यूझीलंडविरूध्दच्या सामन्यात सर्वात वेगवान अर्धशतक परदेशी मैदानावर झळकावले. तिने २६ चेंडूमध्ये ४ चौकार, ४ षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण करत इतिहास रचला. आंतरराष्ट्रीय महिला एकदिवसीय क्रिेकेटमध्ये हा विक्रम तिच्या नावावर नोंद झाला आहे.
दरम्यान, अर्धशतक पूर्ण केल्यानंतर रिचा घोष (Richa Ghosh) खेळपट्टीवर जास्त वेळ टिकू शकली नाही. २९ चेंडूमध्ये ५२ धावा करत ती बाद झाली. एक वेळ अशी होती की, ५ एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात भारतीय टीम आघाडी घेईल, असे वाटत होते. परंतु रिचा बाद झाल्यानंतर भारताच्या साऱ्या आशा संपुष्टात आल्या.
चौथा सामना पावसामुळे २० षटकांचा खेळविण्यात आला. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंड महिला टीमने २० षटकांत ५ विकेट गमावून १९१ धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले. एमलिया कैरने ३३ चेंडूत ६८ धावांची निर्णायक खेळी केली. तर सूजी बेट्सने २६ चेंडूत ४१ धावा केल्या. सोफी डिवाइन आणि एमी सैथर्टवेटने प्रत्येकी ३२ धावांची खेळी केली.