आरवली : पुढारी वृत्तसेवा : आरवली माखजन भागात गारपीट आणि पाऊस पडला. माखजन आणि मुरडव परिसरात गारपीट झाली. यामुळे सर्व परिसर गारठून गेला. या अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे आंबा, काजू पिकाचे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
गेले दोन दिवस आरवली माखजन परिसरात उष्मा कमालीचा वाढला होता. उकड्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. आज सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास आरवली, माखजन, कोंडीवरे आणि मुरडव भागात वादळी पावसाला सुरुवात झाली. तर मोठ्या प्रमाणात गारा कोसळल्या. दरम्यान, कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह अर्धा तासभर जोरदार पाऊस पडला.
चिपळुणात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार वारा सुटला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात धुळीचे कण उडाले. अचानक आलेल्या जोरदार वादळाने बाजारपेठेत तारांबळ उडाली. वाऱ्याच्या मागोमाग पावसाची सुरुवात देखील झाली. महामार्गावरील वाहतूक संथ झाली आहे. बाजारपेठ व रस्त्यावर असलेल्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी जाऊन आसरा घेतला. वादळामुळे महावितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला आहे.
हेही वाचलंत का ?