नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा: भाजपला समर्थन आणि मत देणारे राक्षसी वृत्तीचे आहेत, असे वादग्रस्त विधान काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार रणदीप सुरजेवाला यांनी केले आहे. हरियाणातील कैथल येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. दरम्यान, सुरजेवाला यांच्या या वक्तव्याचा भाजपने समाचार घेतला आहे. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेस केवळ मतदारांचा अपमान करत नाही, तर त्यांना शिव्याही देत आहे. काँग्रेसने सर्व मर्यादा ओलांडल्या असून जनता कोणाला आशीर्वाद देते आणि कोणाला शाप देते हे 2024 मध्ये स्पष्ट होईल. (Randeep Surjewala)
शहजाद पूनावाला म्हणाले की, काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला जे अफझल गुरूला अफझल गुरू जी आणि त्यांच्या पक्षाचे नेते ओस्मा जी आणि हाफिज सईद याला साहेब असे म्हणतात. त्यांनी आज भारतातील जनतेला शिव्या देणे सुरू केले आहे. लोकशाहीच्या मंदिरावर असे आरोप काँग्रेसकडून केले जात आहे. लोकशाही संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे. परदेशात जाऊन भारतात लोकशाहीचा मृत्यू झाल्याचे विधान केले जात आहे. भारतमातेची हत्या झाल्याचेही विधान केले जात आहे. रणदीप सुरजेवाला यांनी आता भाजपला मत देणारे लोक राक्षसी स्वभावाचे आहेत, असे म्हटले आहे. त्यामुळे ज्यांना आपण जनता-जनार्दन मानतो. काँग्रेस पक्षाने अशा सुमारे २३ कोटी लोकांना राक्षसी बनवले आहे. (Randeep Surjewala)
काँग्रेसवर आरोप करताना पूनावाला म्हणाले की, मतदार वेगवेगळ्या निवडणुकीत मतदान करतात. जनता मत देत असते, ज्यांना देव समजले जाते, त्यांना काँग्रेसने दानव म्हटले आहे. यावरून काँग्रेस कोणत्या अहंकारात आहे, हे दिसून येते. त्यामुळे जनता 2024 मध्ये कोणाला आशीर्वाद आणि कोणाला शाप देते हे स्पष्ट होईल.
हेही वाचा