पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करुन फिरविल्याच्या घटनेचा व्हिडिओ प्रकरणाचे तीव्र पडसाद आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये उमटले. कामकाजाला प्रारंभ होताच या प्रकरणी सरकारने चर्चा करावी, अशी मागणी विरोधी पक्षांच्या सदस्यांनी केली. यामुळे झालेल्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज आज दुपारी दोनपर्यंत तहकूब करण्यात आले. मात्र पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतरही या प्रकरणाचे संतत्प पडसाद उमटल्याने दोन्ही सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.
विरोधी पक्ष मणिपूर घटनेचा राजकीय वापर करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. ठाकूर म्हणाले की, आम्ही चर्चेला तयार आहोत, असे सभागृहात सांगितले होते, मात्र विरोधकांना त्यापासून पळ काढायचा आहे. विरोधी राज्यांमध्येही अशा अनेक घटना घडल्या आहेत, परंतु विरोधक या घटनांकडे मूक प्रेक्षक राहिले आहेत, असा आरोपही त्यांनी केला.
विरोधकांनी संसदेचे कामकाज सुरळीत चालू न देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट होत असल्याचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे. मणिपूरमधील घटनेवर आम्ही चर्चा करण्यास तयार आहोत, असे सरकारने स्पष्ट केले असताना, काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष सभागृहाचे कामकाज चालू देत नाहीत. तिला संसदेचे कामकाज चालू द्यायचे नाही, हे स्पष्ट आहे.
मणिपूरच्या मुद्द्यावर पंतप्रधानांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते शशी थरूर म्हणाले की, पंतप्रधानांचे मौन चिंताजनक आहे आणि आपल्यापैकी कोणालाही ते समजले नाही. पंतप्रधानांनी अखेर आपले मौन मोडले याचा आम्हाला आनंद आहे. आता पंतप्रधानांनी संसदेतही यावर चर्चा करावी अशी आमची इच्छा आहे.
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : मणिपूरमध्ये दोन महिलांना निर्वस्त्र करुन फिरविल्याच्या घटनेचा व्हिडिओ आपापल्या प्लॅटफॉर्मवरून काढून टाकावा, असे निर्देश केंद्र सरकारने टि्टरसहित इतर सोशल मीडीया माध्यमांना दिला आहे. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एन. वीरेन सिंग यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा :