वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : वर्षानुवर्ष नुकसानीची शेती केल्याने आज मराठा समाजाची ही अवस्था आहे. जगणं आणि मरणं शेतीवर अवलंबून आहे. मराठा आरक्षण ही लढाई फक्त पाटील यांची नसून संपूर्ण महाराष्ट्राची आहे. या आंदोलनाला मी पाठिंबा देण्यासाठी आलो असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले. शेट्टी यांनी आज अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पाठिंबा दर्शवला.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, जर राज्यकर्त्यांनी दखल घेतली नाही तर हा समाज त्यांना सोडणार नाही. जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्या. जी मागणी आहे ते त्यांच्या हक्काचं आहे तो द्या. काही शुक्राचार्य आडकाठी आणतात कोर्टात जातात. मराठा समाजाच्या आरक्षणाला कुठल्याही पक्षाचा विरोध नाही. म्हणून आजच्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा असे राजू शेट्टी म्हणाले.
मराठा आरक्षणासाठी अजून किती वेळ द्यायचा, फक्त चर्चा सुरू आहे. काही तरी ठोस निर्णय सरकारने घ्यावा. एकदा निर्णय घ्यायचा असेल तर राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या सहीने घेतला जाऊ शकतो, सरकारच्या भूमिकेबद्दल संशय घ्यायला वाव आहे, असंही शेट्टी म्हणाले.
संपूर्ण ऑगस्ट महिना पावसामुळे निरंक गेला आहे. त्यामुळे सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी देखील शेट्टी यांनी केली. यावेळी प्रा डॉ प्रकाश पोपळे, सचिन पाटील, भाऊसाहेब थोरात, कृष्णा साबळे, रवि मोरे, किशोर ढगे, रवींद्र इंगळे,जिल्हाध्यक्ष सुरेश काळे आदींची उपस्थिती होती.
हेही वाचा