पुढारी ऑनलाईन डेस्क : कतारच्या न्यायालयाने ८ भारतीय नौदल अधिकाऱ्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेप्रकरणी भारताला मोठा दिलासा मिळाला आहे. या शिक्षेविरोधात भारताने दाखल केलेले अपील कतार न्यायालयाने स्वीकारले आहे. गुरुवारी हे अपील स्वीकारले गेले असून यावर पुढील सुनावणी लवकरच होणार आहे, असे इंडिया टुडेने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. (Qatar)
ऑक्टोबर महिन्यात कतारच्या न्यायालयाने भारतीय नौदलातील ८ माजी अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. हे अधिकारी गेली वर्षभर कतारच्या अटकेत आहेत. (Qatar)
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी या संदर्भात अधिक माहिती दिली आहे. "कोर्टाचा निकाल हा गोपनीय आहे. प्रथम दर्जाच्या न्यायालयाने निर्णय दिला आहे. हे निकालपत्र आमच्या कायदेविषय टीमकडे सोपवले आहेत. सर्व कायदेशीरबाबी लक्षात घेता अपील दाखल केले आहे. तसेच आम्ही कतारमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत."
परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या प्रकरणातील अधिकाऱ्यांवर सर्वोतपरी मदत केली जात आहे, असे सांगितले आहे.
हे अधिकारी कतारमधील एका कंपनीत कार्यरत होते. कंपनीत काम करत असताना इस्रायलसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोपावरून त्यांना अटक झाली. कॅप्टन नवतेज सिंग, कॅप्टन विरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वशिष्ट, कमांडर अमित नागपाल, कमांडर पुर्नेंद्रू तिवारी, कमांडर सुगुनकार पकल, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश या ८ अधिकाऱ्यांना ३० ऑगस्ट २०२२ ला अटक झाली होती. या अधिकाऱ्यांना जामीन मिळावा, म्हणून वारंवार प्रयत्न झाले होते, पण त्यात यश आले नव्हते.
हेही वाचा