Latest

पुणे : आळंदीकडे चाललेल्या दिंडीत पिकअप घुसली; २ वारकऱ्यांचा मृत्यू, ३० जखमी

निलेश पोतदार

वडगाव मावळ ; पुढारी वृत्‍तसेवा

श्री क्षेत्र आळंदीकडे चाललेल्या पायी दिंडी सोहळ्यात पिकअप गाडी घुसल्याने दिंडीतील सुमारे २५ ते ३० जण गंभीर जखमी झाले असून, दोन जणांचा मृत्य झाला असल्याची शक्यता आहे. हा अपघात आज (शनिवार) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे महामार्गावर कान्हे फाटा येथे घडला.

कोकण भागातील उंबरे, (ता.खालापूर, जि. रायगड) येथील माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्यातील वारकरी शुक्रवारी रात्री नायगाव येथे मुक्कामी होते. आज सकाळी पुन्हा मार्गस्थ होऊन ब्राह्मणवाडी येथे चहा, नाश्त्यासाठी पोहोचण्या अगोदरच कान्हे फाट्याजवळ मुंबई बाजूकडून भरधाव वेगाने आलेली पिकअप गाडी पायी दिंडीत घुसली.

या अपघातात दिंडीतील सुमारे २५ ते ३० जण जखमी झाल्याची शक्यता असून, दोन जणांचा मृत्यू झाल्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथील रहिवासी अर्जुन कुंभार, संदीप कुंभार यांनी तातडीने जखमींना कामशेत येथील बढे हॉस्पिटल, महावीर हॉस्पिटल, सोमाटणे येथील पवना हॉस्पिटल, कान्हे फाटा येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले.

SCROLL FOR NEXT