नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकाऱ्यांना महत्वपूर्ण बैठकांवेळी स्मार्ट डिव्हायसेस तसेच व्हॉट्स अॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram) यासारखे अॅप्स वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. बैठकांतील माहिती लीक होत असल्यामुळे तसेच राष्ट्रीय संचार सुरक्षा धोरणाचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्याने केंद्र सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे शुक्रवारी सूत्रांकडून सांगण्यात आले.
सदरचा निर्णय तात्काळ प्रभावाने लागू करण्याचे निर्देशही सरकारने सर्व मंत्रालयांना दिले आहेत. यामुळे सरकारी अधिकाऱ्यांना अॅपल सिरी, अमेझॉन एलेक्सा, गूगल असिस्टंट यासारख्या स्मार्ट डिव्हायसेसचा वापर बैठकात करता येणार नाही. व्हॉट्स अॅप (WhatsApp), टेलिग्राम सारख्या अॅप्सद्वारे गोपनीय माहिती शेअर करणेदेखील धोकादायक ठरू शकते. कारण खासगी कंपन्या सर्व डेटा आपल्या सर्व्हरवर स्टोअर करतात आणि हे सर्व्हर विदेशात आहेत, असे सरकारचे म्हणणे आहे.
या डेटाचा चुकीचा वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठका घेणाऱ्या व घरून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी देखील निर्देश देण्यात आले असून बैठकावेळी अधिकाऱ्यांनी आपले स्मार्टफोन तसेच स्मार्टवॉच खोलीबाहेर ठेवावेत, असे सांगण्यात आले आहे. शिवाय थर्ड पार्टी अॅपऐवजी भारत सरकारच्या व्हर्चुअल सेटअपचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा :