मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटाच्या बंडखोर आमदारांनी दोन्ही काँग्रेसवर निशाणा साधणे सुरू ठेवले असून कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्यानंतर पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांकडून दाद न मिळाल्याचा दावा केला आहे.
आम्ही गेली ३० वर्ष प्रथम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राष्ट्रवादी सोबत संघर्ष करत आहोत. पुढील निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या विरोधातच आमची लढाई आहे. त्यामुळेच आम्ही सर्व आमदारांनी नैसर्गिक युती व्हावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली होती. परंतु त्यांच्याकडून दाद न मिळाल्याने आम्ही आमचे नेते एकनाथ शिंदे यांना स्पष्ट भूमिका घेण्याचा आग्रह धरला, असे पाटील यांनी सांगितले.
नैसर्गिक युती व्हावी ही अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे. म्हणूनच या विचारधारेसाठी केलेल्या या बंडाच्या भूमिकेला पक्षातील दोन तृतीयांश पेक्षा अधिक आमदार आणि १० सहयोगी अपक्ष आमदारांचे समर्थन आहे, असा दावा त्यांनी केला.