पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि.२८) नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला काँग्रेससह २१ पक्षांनी विरोध केला होता. दरम्यान, उद्घाटनानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिंदमबरम यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे. नवीन संसद भवन म्हणजे पंतप्रधान मोदींचा खासगी प्रकल्प असल्याचे पी. चिंदमबरम म्हणाले आहेत. (Parliament inauguration)
चिंदमबरम म्हणाले, "संसद भवनाची कल्पना मोदींना स्वत:च्या खासगी प्रकल्पामुळे सुचली. संसद भवनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंना आमंत्रित केले नाही, याबाबत चिंदमबरम यांनी सरकारला प्रश्न केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ७९ नुसार, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा हे संसदेचे मुख्य घटक आहेत. संसद भवनाचे उद्घाटन महत्वपूर्ण बाब नाही. मात्र, संसदेत खुली चर्चा होणे, चांगला वादविवाद होणे आणि विरोधी पक्षांची मते विचारात घेणे, या बाबी महत्वपूर्ण आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींना उद्धाटनासाठी बोलावले नाही. शिवाय विरोधी पक्षांनाही आमंत्रित केले नाही." (Parliament inauguration)
संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभानंतर राहुल गांधी यांनी एक ट्विट केले. त्यात त्यांनी लिहिले, "संसद ही जनतेचा आवाज आहे! संसद भवनाच्या उद्घाटनाला पंतप्रधान राज्याभिषेक मानत आहेत." नवीन संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधानांनी नव्हे तर राष्ट्रपतींनी करावे, असे म्हणत काँग्रेसने उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकला होता. राहुल गांधींनीही याच्या समर्थनार्थ आवाज उठवला होता. (Parliament inauguration)