नवी दिल्ली, वृत्तसंस्था : इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या (PAK vs ENG) पहिल्या कसोटी सामन्यात थरारक विजय मिळवला. इंग्लंडने पाकिस्तानचा 74 धावांनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने आपला दुसरा डाव चौथ्या दिवशीच घोषित करण्याची जोखीम घेतली. याचा फायदा त्यांना पाचव्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात झाला. दिवस संपण्यास अवघी काही षटके राहिले असताना इंग्लंडने पाकिस्तानची 10 वी विकेट घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लंडचा हा पाकिस्तानातील फक्त तिसरा कसोटी विजय होता. इंग्लंडच्या या विजयाचा अप्रत्यक्षरीत्या भारताला मोठा फायदा होणार आहे. दुसरीकडे, पाकिस्तानच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्याच्या मनसुब्यांना मोठा धक्का पोहोचला आहे; तर भारताला मात्र याचा फायदा होणार आहे. भारताला आगामी 6 पैकी सहा सामने जिंकणे गरजेचे आहे; परंतु आता पाकिस्तानच्या पराभवामुळे भारत एक कसोटी हरला तरी त्यांच्या पॉईंट टेबलमध्ये फारसा फरक पडणार नाही. (PAK vs ENG)
पाकिस्तान इंग्लंडविरुद्धची पहिली कसोटी सुरू होण्यापूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिप पॉईंट टेबलमध्ये पाचव्या स्थानावर होता. बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान इंग्लंड आणि न्यूझीलंडविरुद्ध मिळून अजून पाच कसोटी सामने खेळणार होता. मात्र, पहिल्या कसोटीत चौथ्या डावात खराब फलंदाजी केल्याने त्यांच्या कसोटी चॅम्पियनशिप फायनलमध्ये जाण्याच्या मनसुब्यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान सध्या अजूनही पाचव्या स्थानावरच आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया किंवा भारताने आगामी कसोटी मालिकेत विजय मिळवला, तर पाकचे फायनलचे स्वप्न धुळीस मिळेल.
भारताची संधी वाढली
पाकिस्तानच्या रावळपिंडीतील पराभवानंतर भारताची फायनल खेळण्याची शक्यता वाढली आहे. जर भारताने बांगला देशला क्लीन स्वीप दिला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणार्या मालिकेत भारताला एका कसोटीत पराभव सहन करावा लागला, तरी फारसा फरक पडणार नाही. कारण, तरीदेखील भारताला फायलन खेळण्याची संधी मिळू शकते. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाने जर वेस्ट इंडिजला व्हाईट वॉश दिला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यात विजय मिळवला; तर त्यांना फायनल खेळण्याची संधी आहे.
अधिक वाचा :