पुढारी ऑनलाईन: लोकांकडून पैसे उकळणे आणि ते काही मोजक्या लोकांकडे हस्तांतरित करणे हे मोदी सरकारचे उद्दिष्ट आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, कोट्यावधी रुपये भारतातून बाहेर गेले आणि ते पुन्हा आले आहेत. यावरून समजते की, भाजप आणि उद्योगपतींचं साटंलोटं आहे, असा हल्लाबोल काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर केला आहे. मुंबई येथील ग्रँण्ड हयात हॉटेलमध्ये आयोजित विरोधी पक्षाच्या 'इंडिया' बैठकीवेळी ते बोलत होते.
पुढे राहुल गांधी म्हणाले, या बैठकीत आम्ही काही अत्यंत प्रभावी निर्णय घेतले आहेत. आम्ही जागावाटपाचे निर्णय जलद केले आहेत आणि सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था म्हणून काम करण्यासाठी समन्वय समितीचे पॅनेल देखील तयार केले आहे. मी हे विश्वासपूर्वक सांगू शकतो की, आम्ही सर्व विरोधक एकत्र आल्याने, भाजपचा विजय अशक्य आहे.
मी लडाखमध्ये एक आठवडा घालवला. चिनी लोकांच्या समोरच मी पॅंगॉन्ग तलावावर गेलो. कदाचित लडाखच्या जनतेबरोबर कोणीही राजकारण्याने आजपर्यंत चर्चा केली नाही. मी जेव्हा त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली, तेव्हा त्यांनी मला स्पष्टपणे सांगितले की, चिनी लोकांनी भारताची जमीन घेतली आहे. लडाखमधील प्रत्येक व्यक्तीला हे माहित आहे. पण चिनी लोकांनी भारताची जमीन घेतली नाही असे पीएम मोदी खोटे बोलत आहेत. हा महत्त्वाचा राष्ट्रीय आणि सुरक्षिततेचा मुद्दा आहे. परंतु दुर्दैवाने मीडिया या घटनांची माहिती देत नाही, याची खंत आहे, असे देखील राहुल यांनी बोलताना स्पष्ट केले.