ठाणे: पुढारी वृत्तसेवा : महावीर जयंतीनिमित्त आज ठाण्यातील श्री. ठाणा जैन महासंघाने आयोजित केलेल्या भव्य रथयात्रेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवून यात्रेचा शुभारंभ केला. तसेच यानिमित्ताने जैन मुनींचे त्यांनी शुभआशीर्वाद घेवून जैन बांधवांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवान महावीरांचे विचार आचरणात आणून मार्गक्रमण करणारा जैन समाज हा अत्यंत शांतताप्रिय समाज आहे. या समाजाने क्षमाशील वृत्ती जोपासून मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत राहण्याला प्राधान्य दिले आहे. आज भगवान महावीरांच्या जयंतीदिनी त्यांचे हेच विचार आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरावे अशा शुभेच्छा सर्वांना देत असल्याचे सांगितले.
राज्यात युती सरकार सत्तेत आल्यानंतर सर्वच सणावरील निर्बंध हटले असून आज महावीर जयंतीनिमित्त निघणारी रथयात्रा त्याच उत्साहात निघत असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे हे सरकार असून यापुढेही सर्वसामान्याना न्याय देण्यासाठी ते कटिबद्ध असेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सचिव संदीप लेले आणि श्री. ठाणा जैन महासंघाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :