पुढारी ऑनलाईन : पुढील काही दिवस देशात कोणत्याही प्रकारची उष्णतेची लाट नाही; परंतु काही भागात तापमान वाढणार असून, ते ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचू शकते (Temperature Increases) असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
IMD दिल्लीचे हवामान वैज्ञानिक कुलदीप श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरे वेस्टर्न डिस्टर्बन्स हे वायव्य भारताकडे मार्गक्रम करत असल्याने उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. तापमानात वाढ झाल्याने वातावरण कोरडे झाले आहे. तापलेल्या वातावरणामुळे जमीन देखील तापली आहे आणि माती सैल झाली आहे. म्हणूनच तापमान अधिक असलेल्या भागात ४० ते ४५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. या जोरदार वाऱ्यामुळे पृष्ठभागावरील धूळ उचलत आहे आणि वातावरणात पसरत आहे. ही धूळ प्रामुख्याने 1-2 किमी उंचीपर्यंत वर उचलून हवेत पसरलेले आहे. त्यामुळे वायव्य भारतात धुळीच्या वादळांची निर्मिती (Temperature Increases) होत आहेत.
देशातील वायव्य भारतातील हरियाणा, दक्षिण हरियाणा, दिल्ली एनसीआर, पश्चिम उत्तर प्रदेश आणि उत्तर-पूर्व राजस्थानमध्ये जोरदार धुळीचे वारे वाहत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे एक वेस्टर्न डिस्टर्बन्स या भागातून पुढे गेला आहे. यामुळेच वायव्य भारतात धुळीचे चक्रीवादळ निर्माण होत आहेत, असेही श्रीवास्तव यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भाला देखील जोरदार धुळीचे वारे वाहणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील लोकांना मंगळवारी (दि.१६) प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागला. सकाळी सहा वाजण्यापासून सुरु झालेले धुळीचे वादळ (Dust storm) दिवसभर कायम होते. धुळीपासून वाचण्यासाठी लोकांना मास्कचा आधार घ्यावा लागला. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दृष्यता 1100 मीटरपर्यंत कमी झाली होती. दरम्यान दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये पुढील तीन दिवस तरी हीच स्थिती राहणार असल्याची शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस ईशान्येकडील राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ईशान्येकडील अरूणाचल प्रदेश, आसाम, मेघायल, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचे 'आयएएमडी'ने नुकत्याच दिलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले आहे.