नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन डेस्क : स्त्री आणि पुरुष अशी कोणतीही निरपेक्ष संकल्पना नाही. स्त्री आणि पुरुष हा भेद फक्त जननेंद्रिया पुरता मर्यादित विषय नाही, उलटपक्षी हा स्त्री आणि पुरुष ही संकल्पना प्रत्यक्षात जास्त गुंतागुंतीची आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. समलैंगिक विवाहांना मान्यता मिळावी, या मागणीच्या याचिकांवर सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने वरील मत व्यक्त केले.
समलैंगिक विवाहाला मान्यता मिळावी यासाठी दाखल याचिकांवर सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमूर्ती संजय किशन कौल, एस. रवींद्र भट्ट, पी. एस. नरसिंहा आणि हिमा कोहली यांच्या घटनापीठासमोर आजपासून सुनावणी सुरु झाली आहे. यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, "कायदेशीर हेतू असा आहे की जैविक स्त्री आणि जैविक पुरुष यांच्यात लग्न झाले पाहिजे. विशेष विवाह कायद्याचाही हेतू असाच आहे."
यावर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड म्हणाले, "जैविक स्त्री आणि जैविक पुरुष ही संकल्पना निरपेक्ष आहे, असे तुम्ही म्हणत आहात का? स्त्री आणि पुरुष ही संकल्पना निरपेक्ष नाही. तुमची जननेंद्रीय कोणती आहेत, याची ती व्याख्या ठरू शकत नाही. विशेष विवाह कायद्यात स्त्री आणि पुरुष म्हटले गेले आहे, पण यात स्त्री आणि पुरुष ही संकल्पना जननेंद्रियावर आधारीत निरपेक्ष नाही."
मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका सुनावणी योग्य आहेत का, असा आक्षेप नोंदवला. यावर सर्वप्रथम निर्णय झाला पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालयाने कोणाताही निर्णय घेण्यापूर्वी देशातील सर्व राज्यांची बाजू जाणून घेतली पाहिजे, असे मत व्यक्त केले. तसेच विवाह हा विषय वैयक्तिक कायद्यांवर प्रभाव टाकणारा असेल, असे मत व्यक्त केले. पण पीठाने मेहता यांचा हा मुद्दा खोडून काढला.
एका याचिकेवर ख्यातनाम विधितज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, "377 कलमांसंदर्भातील निर्णयानंतरही विशेष विवाह कायद्यात स्त्री आणि पुरुष असा उल्लेख आहे, तो जोडीदार असा केला पाहिजे."
कपिल सिब्बल म्हणाले, "माझा सगळ्याच नातेसंबंधांना पाठिंबा आहे; पण समाजावर याचा काय परिणाम होईल, याची काळजी केली पाहिजे. जर समलैंगिक जोडप्याने मूल दत्तक घेतल्यानंतर काही कारणांनी घटस्फोट घेतला या मुलाची जबाबदारी कोणाची? अशा स्थितीत पोटगीचा अधिकार कुणाला असेल?" असे सवालही त्यांनी उपस्थित केले.
ज्येष्ठ विधिज्ञ राकेश द्विवेदी यांनी समलैंगिक विवाहाच्या विरोधी भूमिका मांडली. स्त्री आणि पुरुष यांच्यातील विवाह ही काही फक्त कायद्याची देणगी नाही, तर ही अनादी काळापासून सुरू असणारी संस्था आहे.
हेही वाचा :