पुढारी ऑनलाईन डेस्क : आपलं संपूर्ण जगणं आपल्या विचारांवरच अवलंबून असतं. तुम्ही विचार करता तसेच होता. म्हणून नेहमी सकारात्मक विचार करा, असे नेहमीच म्हटलं जाते; पण सांगण आणि त्याचे कृतीत रुपांतर होणे ही एक मोठी प्रक्रिया आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे तणाव हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे. तणावामुळे मनात नकारात्मक विचारांची ( Negative Thoughts ) संख्या वाढते. असे विचार हे नेहमीच्या तुमच्या व्यक्तिमत्त्वासाठी बाधक ठरतात. चला तर मग जाणून घेवूया नकारात्मक विचार पळवून लावणार्या काही सोप्या टीप्स…
धावपळीच्या जगण्यात आपण अनेक ताण-तणाव घेवून जगत असतो. जगण्याचा वेग एवढा वाढला आहे की, मनातील नकोशा गोष्टी बोलणे अनेकवेळा मनातच राहतं. यातूनच नकारात्मक विचार सुरु होतात. तुम्ही तुम्हाला त्रास देत असणार्या समस्यांबाबत तुमच्या कुटुंबीयांशी किंवा जिवलग मित्र-मैत्रीणींबरोबर बोलणे आवश्यक आहे. कारण कोणताही मानसिक तणाव तुम्ही फक्त स्वत:कडेच ठेवाल तर निश्चित याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर होतो. तुम्ही ताण-तणाव आणि तुमच्या मनात येणार्या नकारात्मक विचार कोणाबरोबर तरी शेअर करणे आवश्यक ठरते. जगण्यातील अनेक समस्यांवर चर्चेतून मार्ग निघतो त्याचबरोबर तुमच्या मनातील नकारात्मकताही कमी होण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या प्रश्नांबाबत बोलत रहा आणि विचारांमध्ये होणारा बदल अनुभवा.
नकारात्मक विचारांमुळे तुमच्या व्यक्तिमत्वावर मोठा प्रभाव पडतो. नेहमीच नकारात्मक विचार केल्याचा परिणाम आरोग्यही बिघडते. हळूहळू तुम्ही सर्वच बाबींकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहता; पण जोपर्यंत तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करत नाही तोपर्यंत तुमचे व्यक्तिमत्त्वच बदलणार नाही. नकारात्मक विचार तत्काळ कमी करण्यासाठी तुम्ही चांगल्या गोष्टींचा विचार करा आणि त्या गोष्टी एका डायरीत लिहून काढा. चांगल्या विचार आणि लिखानाचा सराव केल्यास तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये सकारात्मक परिणाम दिसून देईल.जेव्हा तुम्हाला खूपच नकारात्मक वाटेल आणि ही बाब कोणालाही बोलता येत नसेल तर चांगला विचार करा आणि यावर लिखाण करा. काही दिवसांमध्ये या सरावाचा तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल झालेला दिसेल.
स्मार्टफोन आपल्या जगण्यातील अविभाज्य भाग झाला आहे. याचा अतिरेकी वापरही तुमच्या मनात नकारात्मक विचार वाढण्यास मदत करतो, असे अनेक संशोधनात स्पष्ट झाले आहे. मात्र याच स्मार्टफोनमुळे तुम्ही तुमच्या नातवाईक आणि मित्रपरिवाराच्या संपर्कात राहता. जेव्हा तुम्ही शिक्षण किंवा नोकरी निमित्त बाहेर असता त्याचवेळी तुमच्या आई-वडीलांचा तुमची खुशाली विचारणारा मेसेज येत असतो. तसेच काही मित्र तुमची आपुलकीने चौकशी करत असतात. अशावेळी तुमची काळजी घेणारं कोणीतरी आहे, याची जाणीव तुम्हाला होते. असे संदेशांचे स्क्रीनशॉटस काढून ठेवा, जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार येतात तेव्हा हे स्क्रीनशॉटस वाचा. तत्काळ तुमच्या मनातील नकारात्मक विचार कमी करण्यास होते.
नकारात्मक विचार आणि चालणं याचा काय संबंध ? असा प्रश्न तुमच्या मनात येवू शकतो;पण नियमित चालणे हा एक उत्कृष्ट व्यायाम आहे, हे आजवरच्या अनेक संशोधनात सिद्ध झाले आहे. त्यामुळेच चालणे हा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी एक सर्वात सोपा आणि प्रभावी व्यायाम प्रकार मानला जातो. दररोज नियमित चालण्याने मनातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. तुम्ही जेव्हा एकटे फेरफटका मारण्यास जाता तेव्हा तुमच्या मनातील नकारात्मक निघून जाते. त्यामुळे दररोज नियमित काही पावले चालण्याचा नियमच करा. नियमित चालल्यामुळे सकारात्मक विचारांबरोबर तुमचं व्यक्तिमत्त्व खुलण्यास मदत होते, असे अनेक संशोधनात यापूर्वीच स्प्ट झाले आहे.
हेही वाचा :