Latest

नाशिक : अवकाळीने वन्यप्राणी प्रगणनेवर फेरले पाणी

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात बरसणार्‍या अवकाळी पावसाने बळीराजाच्या तोंडचे पाणी पळविले आहे. अवकाळीचा फटका यंदा वन्यप्राणी प्रगणनेवर झाला आहे. बुद्धपौर्णिमेच्या चांदण्या रात्री लख्ख प्रकाशात अभयारण्ये, राखीव वनक्षेत्रांच्या परिसरात करण्यात येणारी वन्यप्राणी गणना रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. विशेषत: कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील प्रगणनेच्या वन्यजीव विभागाने केलेल्या तयारीवर पाणी फेरले आहे.

दरवर्षी बुद्धपौर्णिमेला वन्यप्राणी गणना केली जाते. यंदाही नाशिक वनवृत्तातील नांदूरमध्यमेश्वरसह ममदापूर-राजापूर, कळसुबाई-हरिश्चंद्रगड, भंडारदरा, राजूर, यावल, आनेर, पाल आणि जामन्या या अभयारण्यांत प्रगणनेची तयारी करण्यात आली. वनविभागाचे कर्मचारी आणि प्राणिप्रेमी रात्रभर पाणवठ्यावर बसून प्राण्यांच्या हालचालींची निरीक्षणासाठी पाणवठ्याजवळ मचान उभारण्यात आल्या होत्या. या प्राणिगणनेत सहभागी होण्यासाठी वन्यजीवप्रेमींसाठी ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, अवकाळी पावसाने प्रगणनेवर विरजण पडले आहे. वन्यप्राणी प्रगणनेसाठी कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यात 28 ते 30 ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात झाडांवर मचान उभारण्यात आल्या होत्या. रतनवाडी, घाटघर, घाटनदेवी, पांजरे, उडदावणे, राजूर, कुमशेत, कोथळे, आंबित, टोलारखिंड आदी परिसरात वन्यजीव विभागाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयाच्या 25 विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि नाशिकमधील पाच ते सहा वन्यजीवप्रेमींनी भंडारदरा येथे हजेरी लावली होती. मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने गणना रद्द करण्यात आली आहे.

बुद्धपौर्णिमेच्या प्रगणनेचे महत्त्व
बुद्धपौर्णिमेला चांदण्या रात्रीचा प्रकाश हा अन्य पौर्णिमेच्या रात्रींपेक्षा अधिक प्रखर असतो. चांदण्या रात्रीचा प्रकाश नैसर्गिक असल्यामुळे वन्यजीवदेखील फारसे घाबरत नाही. रात्रीच्या सुमारास पाणथळे, अभयारण्यांमधील पाणवठ्यांवर तृष्णा भागविण्यासाठी येणारे वन्यप्राणी सहज टिपता येणे शक्य होते. वन्यजीव रात्रीतून पाणवठ्यांजवळ किंवा निरीक्षण मनोरे अथवा मचानाजवळून मार्गस्थ होत असल्याने त्यांची नोंद घेणे शक्य होते.

बुद्धपौर्णिमेला पाणवठ्यावर बसून, तसेच ठशांचा अभ्यास करून वन्यप्राण्यांची गणना केली जाते. या गणनेविषयी प्राणिप्रेमींना खूप आकर्षण असते. यंदाही अभयारण्यात प्रगणनेची तयारी करण्यात आली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे प्रगणना रद्द करण्यात आली आहे. – गणेश रणदिवे, सहायक वनसंरक्षक कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT