नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ यात्रेसाठी घोटी भागातील आलेल्या वारकऱ्यांना साधूंनी कुऱ्हाड, कोयत्याचा धाक दाखवत तंबू उखडून हुसकावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
दरवर्षी घोटी परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने पौषवारीला येतात. यंदाही काही वारकरी बैलगाडीने आले होते. त्यांनी नीलपर्वत पायथा येथे मुक्कामासाठी तंबू उभारले होते. ही जागा जुना आखाडा यांची आहे. यावर्षी आखड्याच्या साधूंनी तारेचे कुंपण घातले आहे. रविवारी (दि. 4) सायंकाळी बैलगाड्या आल्या आणि दरवर्षीप्रमाणे मुक्कमाच्या जागेवर पोहोचल्या. तेथील तार बाजूला करत तंबू उभारला. मात्र आखाड्याच्या साधूंनी आक्रमक पवित्रा घेत त्यांच्या अंगावर धावून गेले. साधूंनी तंबूचे दोर कापत तंबू पाडला. साधूंच्या हातात कोयते आणि कुऱ्हाडी असल्याने जीव वाचविण्यासाठी वारकऱ्यांना पळ काढावा लागला. साधूंनी अतिशय अर्वाच्च शब्दांत दमदाटी केल्याचे संबंधित वारकऱ्यांनी सांगितले.