नाशिक : पुढारी वृत्तसेवा
यंदाचे आर्थिक वर्षे संपण्यास काही दिवसच उरले आहेत. त्यामुळे सध्या सर्वत्र मार्च एण्डची लगबग बघावयास मिळत आहे. विशेषत: बँकांमध्ये आर्थिक व्यवहार उरकण्याची मोठी लगबग असून, देशभरातील बँकांना ३१ मार्चपर्यंत कोणत्याही सुट्या न देण्याचा आरबीआयने निर्णय घेतला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश बँका शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवशीही सुरू होत्या.
मार्च संपल्यानंतर एक आणि दोन एप्रिलला बँकांना दोन दिवस सुट्टी दिली जाणार आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात अनेक बँकांमधील कर्मचाऱ्यांचे काम मोठ्या प्रमाणात वाढले आहे. चालू आर्थिक वर्ष संपत असताना सर्व कामकाज नियोजित वेळेआधी संपवण्यासाठी आरबीआयने बँका सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी बँकांचे कर्मचारी कामावर असल्याचे दिसून आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांसाठी कोणतेही काम केले नाही. मात्र, ग्राहकांना धनादेश बँकेच्या शाखेत जमा करता आले. याशिवाय आरबीआयच्या या निर्णयाचा ऑनलाइन बँकिंगवर कोणताही परिणाम झाला नसल्याचेही दिसून आले.
आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक करा
तुमचे आधारकार्ड पॅनकार्डशी लिंक नसेल तर ते काम तातडीनं पूर्ण करून घ्या. त्यानंतर तुमच्या पॅनकार्डच्या व्यवहारात कोणताही उपयोग होणार नाही. याशिवाय पंतप्रधान वय वंदना योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च आहे. मार्च अखेरपर्यंत आयटीआर भरण्यासाठीची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे मार्च महिना संपण्याआधी ही कामे पूर्ण करावी लागतील.