नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे अखेर गदारोळातच सूप वाजले आहे. अखेरच्या दिवशी कामकाज संपले तेव्हा लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे प्रमुख नेते उपस्थित होते. दरम्यान लोकसभेत केवळ ३९ तास कामकाज झाल्याची माहिती अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिली.
मणिपूरमधील हिंसाचार तसेच दिल्ली सेवा विधेयकावरील गदारोळावरून पावसाळी अधिवेशन गाजले. मणिपूरच्या मुद्द्यावर नियम 267 अन्वये चर्चा घेतली जावी व चर्चेअंती मतदान घेतले जावे, या मागणीवरून विरोधी पक्षांनी दोन्ही सदनात प्रचंड राडेबाजी केली. मागणीला यश येत नसल्याचे पाहून काँग्रेसने लोकसभेत सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता. मात्र सरकारकडे पुरेसे संख्याबळ असल्याने हा प्रस्ताव पडला. विरोधी पक्षांनी पंतप्रधान मोदी यांचे भाषण सुरु असतानाच सभात्याग केल्याने लोकसभा अध्यक्षांना मतविभाजन करण्याची वेळ आली नाही.
लोकसभेत फार काळ कामकाज चालले नाही, हे खरे असले तरी डिजिटल प्रोटेक्शन विधेयक, दिल्ली सेवा विधेयक यासारखी काही महत्त्वाची विधेयके मंजूर झाली. लोकसभेत अखेरच्या दिवशी देखील फारसे कामकाज होऊ शकले नाही. ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो, घोड्यांची रेस आदीवर २८ टक्के कर लावण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेले जीएसटी सुधारणा विधेयक गदारोळात मंजूर करण्यात आले.
हेही वाचा: