पुढारी ऑनलाईन : कित्येक दिवस प्रतीक्षेत असलेला मान्सून अखेर आज ( दि. ११ ) महाराष्ट्रात दाखल झाला. सध्या मान्सून तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल असून, पुढील काही तासात तो संपूर्ण महाराष्ट्रात पोहचणार आहे. दरम्यान, पुढच्या ४ ते ५ दिवसांत राज्यात वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची अंदाज वर्तवण्याचा आला आहे, (Monsoon Forecast 2023) अशी माहिती IMD पुण्याचे प्रमुख के. एस. होशाळीकर यांनी ट्विट करून दिली आहे.
बळीराजा ते सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांचेच लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले होते. आज अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपली. नैऋत्य मान्सूनचे ११ जूनला महाराष्ट्रात आगमन झाले. दक्षिण कोकणातील काही भाग, दक्षिण मध्य महाराष्ट्राचा काही भाग, संपूर्ण गोवा, कर्नाटक व तामिळनाडू व आंध्र प्रदेशचा काही भाग मान्सूनने व्यापला आहे. रत्नागिरी, शिमोगा, हसन, धरमपुरी, श्रीहरीकोटा, दुभरी इथपर्यंतचा भाग मान्सूनने व्यापला आहे. त्यामुळे पुढचे ४, ५ दिवस महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हयात यलो अलर्ट देण्यात आला असून, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
यंदा नैऋत्य मान्सूनचे आगमन हे आठ दिवस उशिरा झाले आहे. साधारणपणे १ जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित असते. मात्र यंदा सहा ते सात दिवस उशीरा मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. तर यंदा महाराष्ट्रात मात्र मान्सून १ दिवस उशीरा पोहचला आहे. यावर्षी मान्सून केरळमध्ये ८ जूनला दाखल झाला, त्यानंतर ११ जूनला त्याचे महाराष्ट्रात आगमन झाले आहे. त्यामुळे कित्येक दिवसांपासून कडाक्याचे ऊन आणि उकाड्याने हैराण झाले होते, मान्सूनच्या आगमनाने मात्र या गरमीपासून दिलासा मिळणार आहे, असे देखील हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.