नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील आत्महत्याग्रहस्त शेतकरी कुटुंबातील अनाथ मुलांसाठीच्या आधारतीर्थ आश्रमात वास्तव्यास असलेल्या राधिका वाल्मीक शेटे (13) या मुलीचा आकस्मिक मृत्यू झाला.
त्र्यंबक पोलिसांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 27) सकाळी सव्वासातच्या सुमारास राधिका आश्रमात चक्कर येऊन पडली. तिला व्यवस्थापक अशोक पाटील व महिला कर्मचारी यांनी तातडीने त्र्यंबक उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. लोखंडे यांनी तपासले असता ती मृत झाल्याचे आढळले. शवविच्छेदनासाठी तिचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तपासणीत तिच्या गळ्याला टॉन्सिलच्या जखमा आढळल्या तसेच पायावर खरचटल्याच्या खुणा आढळल्या. दरम्यान, राधिका लहान असताना एका महाराजाने तिला आश्रमात दाखल केले होते. तिला कोणीही नातेवाईक नसल्याचे समजते. याबाबत त्र्यंबक पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक बिपीन शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.