पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठ्यांवर होणाऱ्या अन्यायासाठी मी आज नाही तर २००७ पासुन बाहेर पडलो आहे. आजपर्यंत मराठा समाजाने सांमजस्याने आणि सहकार्याने मोर्चे आणि आंदोलने केली आहेत. २०१६ ला आपले ५८ मोर्चे काढले आहेत. या ५८ मोर्च्यांमध्ये कुठेही गालबोट लागलेला तुम्हाला दिसणार नाही. त्याचा साक्षीदार फक्त महाराष्ट नाही तर जगही आहे. काल जे काही घडल, लाठीमार केला, गोळ्या झाडल्या. कालचा जो काही प्रकार झाला आहे तो खुप निंदनीय आहे. आम्ही सरकारचा निषेध करतो. (Maratha Reservation Protest) असं म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी जालनामधील मराठा आंदोलकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला. संभाजीराजे यांनी आज जालनामधील अंतरवाली येथे आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात उपोषण करणार्या आंदोलन सुरु होते. आंदोलक गेल्या तीन दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत होते. त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर अचानक लाठीमार सुरू केला. यामुळे मोठा तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, संभाजीराजे छत्रपती आज जालनामधील मराठा आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी गेले आहेत. माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की," हल्ल्याची घटना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्यात होत आहे. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेवून राजकारण करत आहात, तुम्ही म्हणताय आम्हाला सुराज्य करायचं आहे. तुमचं हे सुराज्य आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
तुम्ही लोकांच्यावर गोळ्या झाडता, लाठीमार करता मग आम्ही म्हणायचं का? हे राज्य मोगलांचं आणि निजामांचं आहे. अस जर होणार असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज म्हणून सांगतो, मला एक आठवण करुन द्यायची आहे. १२ वर्षापुर्वी मी म्हटलं होत जर मराठ्यांच्यावर गोळीबार करायचा असेल तर अगोदर माझ्यावर करा. मी मराठा आंदोलकांच्या पाठीशी आहे. जालन्यातील आंदोलंकावर लाठीमार करणाऱ्यांना निलंबन करा. जेणे कोणी हे आदेश दिले असतील त्यांना तातडीने निलंबन करा.
पुढे बोलत असताना संभाजीराजे यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "गृहमंत्र्यांनी साधं त्यांच्या फेसबुक पेजवर मी चुकलो असं म्हटलं नाही. लोकांना लाठीमार केला हे शोभतं का? फडणवीसांना वाटलं नाही का दिलगिरी व्यक्त करावी. मुख्यमंत्री, गृहमंत्री उपमुख्यमंत्री काय बोलणार आहेत याची आम्ही वाट पाहणार आहोत. राजकारण बाजूला सारा आणि इथे या आणि पाहा काय झालं आहे.
जालन्यातील घटनेनंतर संभाजीराजे यांनी एक्स (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटलं आहे की, "अंतरवाली सराटी या गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संविधानिक मार्गाने आंदोलनास बसलेल्या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेराव घालत अमानुष लाठीचार्ज केला. शांततेच्या मार्गाने आपले हक्क मागण्यासाठी जमलेल्या मराठा समाज बांधवांस पांगवण्यासाठी गोळीबार केला. हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कुणाच्या आदेशाने हे सर्व घडले याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा द्यावा, अन्यथा तुम्हाला समाजाच्या रोषास सामोरे जावे लागेल. मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणुकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल."
हेही वाचा