छत्रपती संभाजीनगर ः पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले दहा टक्के आरक्षण एकूण आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांत अंतर्भूत करावे आणि त्यास 'एसईबीसी'च्या सवलती लागू कराव्यात, अशी मागणी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केली आहे. मात्र, सगेसोयरेच्या मागणीवर आपण आजही ठाम आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. गुरुवारी ते येथे पत्रकारांशी बोलत होते.
संबंधित बातम्या
ओबीसीतून आरक्षण द्यायचे तर ती जात मागास असावी लागते. मराठा समाज आता मागास सिद्ध झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने केंद्रात जाऊन 27 टक्के ओबीसी आरक्षणाची मर्यादा वाढवून आता दिलेल्या दहा टक्के आरक्षणाचा त्यात समावेश करावा, असे ते म्हणाले.
विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन असताना एसआयटी चौकशीची मागणी झाली होती. त्यावेळी फडणवीस म्हणाले होते की, पोलिसांनी दिलेल्या अहवालानुसार एसआयटी स्थापन करायची गरज नाही. आता मी दहा टक्के आरक्षण स्वीकारावे म्हणून माझ्यामागे चौकशा लावण्यात आल्या आहेत.
यावरून फडवणीस यांची दुहेरी भूमिका स्पष्ट होते. अर्थात, फडणवीस माझे शत्रू नाहीत. सगेसोयरेची अंमलबजावणी करावी एवढीच आमची मागणी आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.