पुढारी ऑनलाइन डेस्क : Maharashtra Legislative Assembly : विधानसभेत आज संभाजी भिडे तसेच औरंगजेबाचे स्टेटस या दोन मुद्द्यांवरून चांगलाच गदारोळ झाला. पहिले संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही या प्रश्नावरून गदारोळ निर्माण झाला. त्यानंतर औरंगजेबाच्या स्टेटस वरून देखील गदारोळ सुरू झाला. संभाजी भिडे हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सातत्याने चर्चेत असतात. सध्या महात्मा गांधी यांच्या विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे विरोधकांकडून संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका आज विधीमंडळ अधिवेशना दरम्यान पाहायला मिळाले.
काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की संभाजी भिडे हा बोगस माणूस आहे. ते सातत्याने वादग्रस्त करत असतात. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. त्यांना निवडणुकीतील फायद्यासाठी पोलिस संरक्षण मिळाले आहे का? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना प्रत्युत्तर दिले. फडणवीस यांनी भिडे गुरुजींना कोणतेही पोलिस संरक्षण देण्यात आलेले नाही, असे स्पष्ट केले. मात्र, त्यांनी संभाजी भिडे यांचा भिडे गुरुजी असा उल्लेख केल्यानंतर विधानसभेत यावर टीका करण्यात आली. यावर फडणवीसांनी पुन्हा स्पष्टीकरण दिले ते भिडे गुरुजी या नावाने ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा भिडे गुरुजी उल्लेख केला आहे.
संभाजी भिडे यांच्यावरून गदारोळ संपतो ना संपतो तोच विधानसभेत औरंगजेबाच्या स्टेटस वरून पुन्हा सभागृहात गदारोळ सुरू झाला. यावेळी फडणवीसांनी सांगितले की, औरंगजेब कोणाचाही नेता होऊ शकत नाही.