पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेली वक्तव्ये बेजबाबदार आहेत. सीमाप्रश्नाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संयमाची परीक्षा बघू नये, असा इशारा असा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.
पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले, सीमाभागात आज घडलेला प्रकार निषेधार्थ आहे. त्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह, नेत्यांनी एकत्र येत, यावर मार्ग काढावा, असे आवाहनही त्यांनी केले.
सीमाभागात महाराष्ट्रातील वाहनांवर होणारे हल्ले २४ तासांमध्ये थांबले पाहिजेत. नाहीतर परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते, असा इशारा देत अशा प्रकारचे हल्ले म्हणजे देशाच्या एकात्मतेवरील हल्ला आहे, असेही पवार म्हणाले. या प्रश्नी केवळ बघ्याची भूमिका न घेता आता ठोस कृती करावी, असे आवाहनही त्यांनी केंद्र सरकारला या वेळी केले.