पुढारी ऑनलाईन डेस्क : उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत युती करावी, असे आवाहन एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज माध्यमांशी बोलताना केले.
"आम्ही अजूनही शिसेनेसोबतच आहोत. लवकरच आम्ही सर्वजण महाराष्ट्रात येणार आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे. महाविकास आघाडीतून बाहेर पडलो तर प्लोअर टेस्टची गरज नाही. राजीनामा न देता उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडावं, त्यानंतर भाजप आणि शिवसेनेचे सरकार येईल." असा विश्वासही केसरकर यांनी आज व्यक्त केला.
उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादीचे काही सल्लागार महत्त्वाचे वाटतात. समजूत काढण्याऐवजी धमक्या दिल्या जात आहेत. आम्हाला उद्धव ठाकरेंबद्दल आदर आहे. बाळासाहेबांचे विचार आम्ही सोबत घेऊन पुढे घेऊन जात आहोत. जनमताच्या कौलाप्रमाणे युती सरकार यायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले असते तर बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली असती. एकनाथ शिंदे हेच आमचे गटनेते आहेत. त्यांच्याकडेच बहुमत आहे. १०-१२ आमदार वगळता सर्व आमदार आमच्या बाजूने आहेत. उरलेल्या १४-१५ जणांना आमच्यासोबत यावेच लागेल. त्यामुळे सर्व निर्णय एकनाथ शिंदेच घेतील असं सांगत त्यांनी मुंबईत कधी यायचं हे शिंदेच ठरवतील. भाजप आणि सेनेचं सरकार लवकरच महाराष्ट्ररात येईल, असाही दावा त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा