पुणे : मानवी अस्तित्व उत्क्रांतीत वन्यजीव संपदेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. जंगलाचा राजा म्हणून सिंह प्राणी ओळखला जातो. मात्र, अलीकडच्या काळात केवळ गीर जंगलामध्येच सिंहाचे अस्तित्व राहिले असल्याने सिंह नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पर्यायाने शासनाने सिंहाचे संवर्धन करणे काळाची गरज असल्याचे मत प्राणी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 10 ऑगस्ट रोजी जागतिक सिंह दिन साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर जंगलच्या राजांची संख्या दुर्मीळ होत असल्याबाबत चिंता व्यक्त होत आहे.
साधारणतः सिंह दक्षिण आफ्रिका, आशिया खंड, युरोप आणि मध्य पूर्वभागात मुक्तपणे संचार करीत असत. आशियाई सिंह एकेकाळी ग्रीसपासून मध्य भारतात मध्य प्रदेश, उत्तर भारतात बिहारपर्यंत होते. सध्या हे सिंह आफ्रिका आणि आशिया खंड या दोनच भागात आढळून येतात. शिकारीमुळे ते आता फक्त गुजरात राज्यातील गीर हे आशियाई सिंहांचे एकमेव आश्रयस्थान आहे. दोन वर्षांपूर्वी सिंहाच्या संवर्धनाच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांच्या संख्येत सुमारे 30 टक्के वाढ झाली आहे. मात्र, ही वाढ कमी असून केवळ 450 सिंह या जंगलात शिल्लक आहेत.
सिंहाचे इतके असते वजन
प्रौढ सिंहाचे वजन नर 150-250 किलो आणि मादी 120-182 किलो असते. नर सिंहाचे वजन 181 किलो आहे आणि मादी सिंहाचे वजन 126 किलो आहे. 272 किलो वजनाचा एक नर सिंह माउंट केनियाजवळ सापडला.
वास्तविक पाहता वाघांची संख्या वाढविण्याच्या द़ृष्टीने सरकारने जे प्रयत्न केले त्याच धर्तीवर सिंहांची संख्या वाढविणे, त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आवश्यक आहे. केवळ गीरच्या जंगलात सिंहाचे वास्तव्य असून, मध्य प्रदेशमधील जंगलात हलविण्याचा आणि संख्या वाढविण्याबाबत निर्णय झाला होता. परंतु, तो प्रस्ताव बारगळला आहे. शासनाने शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने मध्य प्रदेशबरोबरच राज्यातील इतर जंगलांमध्येही सिंहाची संख्या वाढविण्यावर भर देणे आवश्यक आहे.
– अनुज खरे, सदस्य, महाराष्ट्र राज्य वन्य जीव मंडळ