बेळगाव ; पुढारी वृत्तसेवा : गुढी पाडव्याच्या सणाला राज्यातील राजकारणात बदल होतील, असे वक्तव्य विजापूरचे आ. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी केले आहे. राज्यात नेत्यांची दुसरी फळी तयार व्हावी. याआधी येडियुराप्पांचे युग होते. ते संपुष्टात आले आहे. त्यांच्याप्रमाणे आणखी तीन ते चार जणांचे युगही संपत आले आहे. केंद्रामध्ये वाजपेयी यांच्यानंतर मोदींचे युग आले. (Karnataka politics)
बसवराज बोम्मई यांना बदलण्याची भाषा मी करत नाही; पण माध्यमांतूनच तशी चर्चा सुरू आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.
यत्नाळ यांनी असंतुष्ट आमदार आमदार रमेश जारकीहोळी यांची बेळगावात भेट घेतली.
ते म्हणाले, प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांच्या बदलाची शक्यता नाही. त्यांनी संघटना मजबूत केली आहे. राज्य मंत्रिमंडळात काही बदल होतील. काही नव्या चेहर्यांना संधी दिली जाईल.
पुढील निवडणुकीत महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली जाणार असल्याचा विश्वास आहे. मंत्रिमंडळ विस्तार किंवा पुनर्रचना करायची असेल तर आताच करा, अशी मागणी पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. त्यावर त्यांना पत्रकारांनी छेडले असता आता केवळ काहीच दिवस वाट पहावी लागणार असल्याचे ते म्हणाले.
आ. रमेश जारकीहोळी मंत्रिपदी असताना दोनवेळा विजापूरला आले होते. दोन्ही वेळा त्यांनी माझ्या घरी भोजन केले होते. बेळगाव दौर्यावर आल्यानंतर घरी येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले होते.
त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून मी त्यांची भेट घेतली. ते पक्ष सोडणार नाहीत. कुणीही पक्ष सोडण्याच्या तयारीत नसल्याचा दावा पाटील यांनी केला.