पुढारी ऑनलाइन डेस्क : Joshimath Badrinath Landslide : गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडातील जोशीमठमध्ये सातत्याने भूस्खलन होत आहे. याचा फटका आता सामरिक महत्त्व असलेल्या बदरीनाथ महामार्गालाही बसला आहे. बदरीनाथ हायवेला मोठ-मोठे तडे गेले आहेत. हे सीमा सुरक्षेच्या दृष्टीने चिंताजनक बनले आहे. हे तडे पडणे थांबले नाहीत तर लवकरच महामार्गाचा एक मोठा भाग कधीही जमीनदोस्त होऊ शकतो. अशा परिस्थितीत भारतीय सैन्यदलाचा चीनच्या सीमेशी संपर्क तुटण्याचा धोका निर्माण झाला आहे.
जोशीमठ हे स्थान चीनशी जवळ असलेल्या सीमेजवळील जिल्हा चमोलीमध्ये येतो. जोशीमठपासून बद्रीनाथ महामार्ग फक्त ४६ किलोमीटवर आहे. तर बद्रीनाथपासून पुढील रस्ता हा चीन सीमेजवळ जातो. सध्याच्या परिस्थितीत चीनकडून वारंवार होणा-या घुसखोरीच्या प्रयत्नामुळे केंद्र सरकारचा भर हा सीमेवर रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यावर आहे. या दृष्टीकोनातून बद्रिनाथ महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू आहे. संकटाच्या परिस्थिती भारतीय सैन्याला आपल्या पूर्ण साहित्यासह अगदी सहजरित्या द्रूतगतीने सीमापर्यंत पोहोचता यावे म्हणून बद्रिनाथचे रुंदीकरण केले जात आहे.
अशा परिस्थितीत बद्रीनाथ महामार्गाला कोणता पर्याय आहे, याचाही आता विचार होत आहे. त्यादृष्टीने हेलंग बायपास निर्माण केला जात आहे. मात्र, सध्या हेलंग बायपासच्या काम थांबवण्यात आले आहे. त्यामुळे बद्रीनाथ सध्या तरी पर्याय नाही.
एकीकडे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बदरीनाथ महमार्गाचे रुंदीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. जेणेकरून भारतीय लष्कराला चीन सीमेवर अल्पावधीत पोहोचता यावे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून बद्रीनाथ महामार्गाला सातत्याने मोठमोठे तडे जात आहे. महामार्गांना पडलेल्या या भेगा खूप खोल आहेत. त्यामुळे 'बीआरओ'च्या प्रयत्नांना खीळ बसत आहे. परिणामी 'बीआरओ'ची चिंता वाढली असून, भूस्खलनाची ही आपत्ती आता डोकेदुखी बनत चालली आहे.
जोशीमठच्या परिस्थितीचे अध्ययन करण्यासाठी डेहराडूनवरून भू वैज्ञानिकांची टीम या महामार्गावर पोहोचली आहे. त्यांनी महामार्गाचा संपूर्ण आढावा घेतला आहे. त्यांच्या मते भूस्खलन थांबले नाही तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. तसेच हा अतिशय संवेदनशील विषय आहे. भू वैज्ञानिकांनी संपूर्ण परिसराचे निरीक्षण केले आहे. अद्यापतरी या मागील कारण तपासले जात आहे. , अशी माहिती सूत्रांकडून समजत आहे.
जोशीमठची सद्यस्थिती ही वातावरणातील बदल आणि सततच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांचा परिणाम असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीचे संचालक कलाचंद सेन म्हणाले की, ही भूगर्भीय बदल प्रथमच घडलेला नाही. यापूर्वीच याची चाहूल लागली होती. आता प्रत्यक्षात हा बदल जाणवत आहे.
दरम्यान, जोशीमठमध्ये फसलेल्या 600 कुटुंबीयांना हेलिकॉप्टर द्वारे तत्काळ बाहेर काढण्याचे आदेश उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांनी दिले आहे. ते आज जोशीमठचा दौरा करणार आहे. मुख्यमंत्री सिंह म्हणाले, " नागरिकांचे प्राण वाचवणे याला आमचे पहिले प्राधान्य आहे. जोशीमठमधील घरांमध्ये राहणाऱ्या सुमारे 600 कुटुंबांना सुरक्षितस्थळी हलवण्यास अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे."
हेही वाचा: