पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडमधील देवघर येथील त्रिकूट टेकडीवर रोपवे ट्रॉली एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. तर ४८ जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना रविवारी घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. जखमींना देवघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर रोपवे व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी घटनास्थळावरून पळून गेले आहेत.
या अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. तांत्रिक बिघाडामुळे केबल कारची टक्कर होऊन हा अपघात झाला असावा, अशी शक्यता एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत अनेक जण जखमी झाले आहेत. आज (सोमवार) सकाळी हवाई दलाचे हेलिकॉप्टर बचावकार्यासाठी दाखल झाले आहे. केबल कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न करताना पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
देवघरचे पोलीस उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांनी सांगितले की, बचावकार्यासाठी एनडीआरएफचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत आहेत. लोकांनी अफवा पसरवू नये. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. रोपवेवर केबल कारमध्ये अजूनही काही लोक अडकले असून त्यांची सुटका करण्यात येत आहे. सर्व पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात येत आहे. रोपवेवर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी लष्कराच्या जवानची मदत घेण्यात येत आहे. हेलिकॉप्टरने मदत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, त्रिकूट रोपवे दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांप्रती मी शोक व्यक्त करतो, अशा प्रतिक्रिया खासदार निशिकांत दुबे यांनी दिली आहे.
हेही वाचलंत का ?