जळगाव : पुढारी वृत्तसेवा
कपाळावर धारदार शस्त्राने वार करत गळा चिरून युवकाची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार घडला असून भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीक असणाऱ्या पाटचारीत युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौरभ यशवंत चौधरी (३१, रा. दशरथनगर, जळगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. स्थानिक नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी याबाबत नशिराबाद पोलिसांना खबर दिल्यावरून तत्काळ घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. यावेळी क्रुरपणे सौरभचा गळा चिरलेला तर कपाळावर घाव घालण्यात आलेले होते. दोन्ही हातांची त्वचा बाहेर आलेली होती. अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, भुसावळ विभागाचे डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अनिल मोरे, उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे, सहायक फौजदार अलियार खान, हवालदार शिवदास चौधरी, रवींद्र तायडे, लिना लोखंडे व गणेश गायकवाड यांनी घटनास्थळी पाहणी केली असून तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. दरम्यान, सौरभ याचा खून कोणी व कशासाठी केला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. परंतु अत्यंत क्रुरपणे गळा चिरुन खून केल्यामुळे अनेक जण हादरून गेले आहेत.