जळगाव : पुढारी वृत्तसेवा : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागतध्यक्ष या पदाची धुरा सांभाळणारे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन समारोपाच्या समारंभाला अनुपस्थित राहिले. तर दुसरीकडे जळगाव येथील पत्रकार परिषदेला त्यांनी हजेरी लावली, यामागचे कारण मात्र समजू शकले नाही.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन यांच्या खांद्यावर धुरा देण्यात आलेली होती. तर अमळनेरचे स्थानिक भूमिपुत्र मंत्री अनिल पाटील यांनी आमंत्रक म्हणून मोठी भूमिका पार पाडली. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली जबाबदारी शेवटच्या दिवसापर्यंत चोख पार पडली.
मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर होती. समारोपाला मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नसल्यामुळे महाजन यांनी उपस्थिती लावणे गरजेचे होते. मात्र, त्यांनी जळगाव शहरात पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी आपली उपस्थिती लावल्याने चर्चांना सुरूवात झाली आहे. मुख्यमंत्री यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत.