नांदेड : पुढारी वृत्तसेवा राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे.
2019 मध्ये युतीमध्ये निवडणूक लढवून बहुमत मिळालेले असतानाही शिवसेनेने शेवटी काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत येऊन सरकार स्थापन केले. या घटनेने राजकीय जाणकारांना आश्चर्याचा धक्का बसला; पण आता भाजपसोबत राहायचे नाही, ही शिवसेनेची भूमिका त्यापूर्वी म्हणजे देवेंंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारच्या काळातच झाली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठनेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी, माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असे चव्हाण यांनी सांगितले.
अशाप्रकारचे सरकार स्थापन करायचे असल्यास तुम्ही आधी शरद पवार यांच्याशी चर्चा करा, असे मी या नेत्यांना सांगितले होते. परंतु, ते पवार यांना पुढे भेटले किंवा नाही, याबाबत मला नंतर काहीही माहिती नाही, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांचे स्वागत नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असून, मी नांदेड जिल्ह्यात त्यांचे स्वागत करतो. नांदेडच्या विकासाचे प्रश्न नव्या पालकमंत्र्यांनी मार्गी लावावेत, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली.
हेही वाचलंत का?