देशाची राजधानी दिल्लीतील प्रदूषणासाठी ( Delhi pollution ) फटाके नव्हे तर बायोमास बर्निंग, बांधकाम निर्माण कार्य, उद्योगांद्वारे होत असलेले प्रदूषण आदी बाबी जास्त कारणीभूत असल्याचे नव्या पाहणी अभ्यासात दिसून आले आहे. 'दिवाळीचा सण आणि कोरोना संकटकाळातले तीन महानगरांतील प्रदूषण' या नावाने हा पाहणी अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे.
देशात प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. विशेषतः थंडीच्या दिवसात महानगरांमध्ये वातावरण कलुषित होत असते. यासाठी फटाके कारणीभूत असल्याचा आरोप अलीकडील काळात वाढला आहे. मात्र प्रदूषणासाठी बायोमास बर्निंग, बांधकाम निर्माण कार्य, उद्योगांद्वारे होत असलेले प्रदूषण जास्त जबाबदार असल्याचे दिसून आले आहे. दिल्लीचा विचार केला तर इथले हवामान प्रदूषण वाढीसाठी पोषण असल्याचे दिसून आले.
आभ्रा चंदा, जयत्रा मंडल (स्कूल ऑफ ओशियानोग्राफिक स्टडीज) आणि सौरव सामंत या तज्ज्ञांनी दिल्ली, कोलकाता, मुंबई या शहरातील पीएम 2.5, पीएम 10, एनओ 2, एनएच 3, एसओ 2, सीओ आणि ओ 3 या कारकांचा अभ्यास करून प्रदूषणविषयक अहवाल बनविला आहे. मुंबई आणि कोलकाता या शहरात गतवर्षीच्या दिवाळीवेळी प्रदूषण जास्त वाढले नव्हते. दुसरीकडे दिल्लीमध्ये खराब हवामानामुळे वायू प्रदूषणाची स्थिती खराब झाली होती. 2019 च्या तुलनेत दिल्लीत प्रदूषण जास्त वाढले होते.