पुढारी ऑनलाईन : गेल्या १६ दिवसांपासून इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यात रक्तरंजित संघर्ष सुरूच आहे. इयुद्धात अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुटकेसाठी भारत सरकारकडून 'ऑपरेशन अजय' राबवले जात आहे. या अंतर्गत आज ( दि. २२) भारतीय नागरिकांना घेऊन तेल अविवमधून सहावे विमान भारताकडे रवाना झाले आहे, अशी माहिती भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली. (Israel-Hamas War)
इस्रायल-हमासच्या युद्धादरम्यान भारत पॅलेस्टिनी नागरिकांच्या मदतीला धावला आहे. भारतीय हवाई दलाचे IAF C-17 हे विमान आज (दि.२२) सकाळी वैद्यकीय आणि आपत्ती निवारण साहित्य (India Sends Aid to Palestine) घेऊन इजिप्तकडे रवाना झाले. ते इजिप्तच्या अल-अरिश विमानतळावर उतरणार आहे, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे.
भारताने पॅलेस्टाईनमधील लोकांसाठी सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्याची मदत पाठवली आहे. हे सर्व साहित्य घेऊन IAF C-17 हे विमान आज गाझियाबादमधील (उत्तर प्रदेश) हिंडन एअर बेस विमानतळावरून इजिप्तकडे रवाना झाले आहे. यात जीवनरक्षक औषधे, शस्त्रक्रियेसाठी लागणा-या वैद्यकीय वस्तू, तंबू, झोपण्याच्या पिशव्या, ताडपत्री, स्वच्छताविषयक उपयुक्त साहित्य, पाणी शुद्धीकरण गोळ्या यासह इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.